बिहार ही देशासाठी 2014 च्या लोकसभेनंतरची सर्वात मोठी निवडणूक होती. मोदींच्या पंतप्रधानपदाला विरोध करणारे नितीशकुमार येथे लढणार होते. मागील विधानसभेत सुपडा साफ झालेल्या लालू प्रसाद यादवांच्या अस्तित्वाची ही लढाई होती तर काँग्रेसला अजून आपण जिंवत आहोत हे दाखवायेचे होते. (काँग्रेसबद्दल बोललो नसतो तरी हे वाक्य पूर्ण झाले असते.) हे झाले मोदी आणि भाजप विरोधकांचे. पण गेल्या 18 महिन्यात आपण काय दिवे लावेल, हे सांगत नरेंद्र मोदींना पंतप्रधानपद पणाला लावायला लावणारी ही निवडणूक होती. निवडणूक व्यवस्थापनाचे चाणक्य ज्यांना भाजपने म्हणण्यास सुरुवात केली होती, आणि त्यांच्या सूरात सूर मिसळत भारतीय माध्यमांनीही तशीच री ओढली होती, त्या दाढीवाल्या चाणक्याची बिहारच्या जनतेने बिनपाण्याची केली. या निकालानंतर मला एकदा तरी बिहार पाहून यावा असे मनोमन वाटत आहे. पाच टप्प्यात बिहारची निवडणूक झाली आणि प्रत्येक टप्प्यात निवडणूक प्रचाराचा मुद्दा बदलेला होता. महाराष्ट्रात जसे विदर्भात गेले की कास्तकरी, शेतकरी आत्महत्या. पश्चिम महाराष्ट्रात उसाला भाव, साखर कारखाने, उद्योग, सहकार. कोकणात रेल्वे, आंबा-काजू निर्या...