मुख्य सामग्रीवर वगळा

(अ)सत्यबाबाची पूजा

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपली. काँग्रेस - राष्ट्रवादीला अनपेक्षित बहूमत मिळले. आणि पुन्हा एकदा शंकरराव चव्हाण पुत्र अशोक चव्हाणांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. अशोक चव्हाण विक्रमी मताधिक्याने निवडून आले. हे सगळं यश मुख्यमंत्र्यांना लोकशाहीतील मतदारराजा आणि काँग्रेसश्रेष्ठींच्या कृपादृष्टीमुळे मिळालेले आहे, हे महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान न केलेला एखादा पोरही सांगू शकेल. मात्र चव्हाणांचा विश्वास लोकशाहीतील 'देवा' पेक्षा देव-देव करणा-या बाबावरच जास्त असल्याचे रविवारी महाराष्ट्रदेशाने पाहिले.

राजकारणी कुडमुड्या जोतिषा पासून 'जागृत' देवस्थानाचे निस्सीम भक्त असतात. हे ही सर्वश्रुत आहे. डाव्या चळवळीतील - पुरोगामी म्हणविणारेही बरेच जण चोरुन लपून देवदर्शन घेऊन येतात. मुलाबाळांच्या लग्न पत्रिकांवर याच्या त्याच्या कृपेनं छापतात. वेगवेगळ्या नावाने भंडारा, कंदूरी, न्याज च्या पंगती उठवतात. मात्र काल मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी शासकीय निवासस्थानी , शासकीय खर्चाने , सुटीच्या दिवशी शासनाचे कर्मचारी राबवले ते सत्यसाईबाबाची पाद्यपूजा करण्यासाठी.

उठता बसता पुरोगामीत्वाची टिमकी मिरवणारे काँग्रेसीही यावेळी चव्हाणांची पाठराखण करतांनाच दिसत होते. शाहु-फुले-आंबेडकरांचे उठता बसता नाव घ्यायचे आणि त्यांच्याच महाराष्ट्रात भोंदू बाबाची शासकीय पूजा करुन घ्यायची . हे फक्त या काँग्रेसींनाच जमु शकतं.

ह्या सत्यसाईबाबाचा इतिहास आणि भक्तगण पाहिलातर त्याचीही या राजकारण्यांमधे बरीच उठबस दिसून येते. काँग्रेसचे हेडमास्तर तथा मुख्यमंत्र्यांचे पिताश्रीही या बाबाचे कट्टर भक्त होते. तसेच तासा तासाला कपडे बदलणारे शिवराज पाटील चाकूरकरांपासून, डोईवरील एकही केस न विस्कटू देणारे विलासराव देशमुखांपर्यत सर्वजण या (अ)सत्यबाबाचे पट्टशिष्य. यासोबतच आंध्र- कर्नाटकातही या बाबाच भक्तगण मोठ्याप्रमाणात आहे. आपल्या भक्तांना हा बाबा हवेतून सोन्याची साखळी काढून देतो. कायम आपल्याच धुंदीत असल्यासारखा वेडेवाकडे हातवारे काय करत असतो. आणि मह्त्वाचं म्हणजे या बाबाचे भक्त हे कोट्याधीश, सत्ताधारी , पुंजीपतीच कसे काय. या बाबाच्या सत्याचा भास- आभास काय फक्त पैशांच्या जोरावरच होतो की काय ? मुख्यमंत्र्यांनी किंवा इतरांनीही कोणाची पूजा करावी , कुठे करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . हे आम्हालाही मान्य. परंतू आमच्या कर रुपी पैशातून ज्या बंगल्याचा खर्च चालतो. तेथील कर्मचा-यांचे पगार दिले जातात. तिथे ही सवंग भक्ती करायची यांची हिम्मत तरी कशी होते. तुम्हाला पाद्यपूजा की काय ते करायचे तर तुमच्या मालकीच्या घरात जावून करा. मात्र त्यानंतर आमच्या शाहू - फुल्यांचे नाव घेवू नका. महाराष्ट्राने तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे. आमच्या जीवावर तुमचे चोचले पूरवण्याचे लायसन्स नाही. हा (अ)सत्यसाईबाबा स्वत:ला देवाचा अवतार समजतो. आणि महाराष्ट्रदेशाचे मुख्यमंत्री , राष्ट्रवादीचे जयंत पाटील महाराष्ट्रच्या पुरोगामीत्वाचे श्राध्द घातल्यासारखे या बाबाची साग्रसंगीत पूजा करतात. यांच्या या अशा वागण्याने देऊळा- राऊळात जावून दगडात देव शोधणा-या सामान्य माणसाचाही देवावरचा विश्वास उडायचा...

'वर्षा'वर भूत-प्रेतांचा वावर आहे. अशाही बातम्या काल दिवसभर मिडियात होत्या. या भुतांचे शांतवन करण्यासाठीतर अशोकराव तुम्ही हा पूजेचा घाट घातला नव्हाताना. मात्र तुम्हाला सळो की पळो करणारं भूत पूढील पाच वर्ष तुमच्या आजू बाजूलाच राहणार आहे. हे तुम्ही कसं विसरता. त्यासाठी कोणत्या पूजा करणार हे ही सांगून टाका.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...