मुख्य सामग्रीवर वगळा

'आपला' माणूस सत्तेपासून कोरडा का?

महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या आणि दिवळीला सुरवात झाली आहे.या दोन्ही सणांच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावातील आई, वडिल आणि मुलगा या उमेदीच्या वयातील कुटुंबाची हत्या करून त्यांचे तुकडे करून विहीरीत टाकण्यात आले. आता राज्यात कोणाचेही सरकार नसल्यामुळे कोणी मंत्री फिरकणार नाही, निवडणुका संपल्यामुळे आमदार आणि काल आमदार होण्याच्या शर्यतीतीलही फिरकणार नाहीत. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर तेवढे अत्याचार पर्यटन करुन येतील. पुढे काय?

नगरमध्ये याआधीही काही महिन्यांपूर्वी अशाच दोन घटना झाल्या ही, तिसरी! एवढेच काय ते येथील पोलिस प्रशासनासाठी या घटनचे महत्त्व. सहा महिन्यांपूर्वी नितीन आगे या तरुणाचे हत्याकांड झाले होते. त्याच्या आरोपींचे काय झाले हे नंतर दलित नेत्यांनी प्रशासन आणि राज्यकर्त्यांना विचारले का? तर याचे उत्तर नाही असेच आहे.काल हत्याकांड झालेल्या सुनील जयश्री संजय जाधव या मुलगा - आई - वडिलांच्या हत्याकांडाचे वेगळे काय होणार. याला तुम्ही आणि मी जबाबदार नाही का? नगरमध्येच का हत्या होत आहेत असा माझा प्रश्न नाही, तर दलितांवरच ही वेळ का येत आहे?

नगरमध्ये पाणी आणि सहकाराने समृद्ध झालेले दलितेत्तर संरजामशाहीने वागत नाहीत का?

पोलिस आणि प्रशासनाची त्यांनी भीती वाटत नाही का? की त्यांच्या आशीर्वादानेच हे सुरु आहे?

सहकाराने समृद्ध झालेल्या या जिल्ह्यात उठता-बसता फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेणार्‍या पक्षाचेच आमदार आहेत. .यांच्या मुखी ह्या तीन महानुभावांच्या नावाला काही अर्थ आहे का?

असे, का? का? मनात खूप साचले आहेत. त्याला एकच उत्तर मला सापडत आहे. ते म्हणजे संघटन शक्तीचा झालेला क्षय, भरून यावा. तुम्ही रस्त्याने चालले की, लोकांना तुमची जरब बसावी. नको रे बाबा, यांच्याशी पंगा नको. याचा अर्थ दलितांची दहशत निर्माण व्हावी असा मुळीच नाही. दलितांच्या संघटन शक्तीची भीती वाटली पाहिजे. यांच्याकडे डोळे वर करुन पाहिले तरी आपल्या त्याचे उत्तर द्यावे लागले, अशी अनामिक भीती असली पाहिजे.

आपली संघटना मजबूत नसल्याने राजकीय ताकद नाही, आणि राजकीय ताकद नसल्याने आपला कोणावर वचक नाही. असे हे दुष्टचक्र निर्माण झाले आहे. ते भेदण्याची संधी 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने आली होती. पण आपले नेते वाटलेले, संघटन जागोजागी फाटलेले. त्यांना चिंता फक्त त्यांच्या खासदारकीची आणि आमदारकीची. त्या राज ठाकरेने भर सभेत तुमची टोपी उडवली. 'एवढ्या वर्षात यांना स्वतःचे चिन्ह नाही मिळवता आले', हो नाही, मिळवता आले. पण येणार्‍या निवडणुकीत ते मिळवून दाखवू, असे म्हणण्याची धमक रामदास आठवलेंनी दाखवली नाही. (आता त्या राज ठाकरेंच्या मनसेचे इंजिनही गोठण्याची शक्यता आहे.) राज ठाकरेंनी रामदास आठवलेंचे नाव घेतले म्हणून हे बोल फक्त त्यांनाच लागू होतात असे नाही, तर राज्यातील सर्वच  रिपाईच्या लोकांना लागू होतात. पण ते कोणाच्या जीवाला लागत नाही, याचेच दुःख आहे. 'मेरी करोगे नक्कल तो मै कर दूंगा तुम्हारा टक्कल' ही आमचे नेते म्हणवणार्‍यांची अक्कल !

दुसरे एक नेते जे स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व टीकवून असलेले नेते म्हणजे प्रकाश आंबेडकर. पण त्यांचे राजकारण सर्वसामान्य दलितांपर्यंत कधी पोहोचतच नाही. जो काल त्यांच्या बॅनरखाली निवडून आला तो उद्या त्यांच्यापासून दूर झालाच म्हणून समजा. हा यांचा इतिहास आणि वर्तमानही. संपूर्ण राज्यातून यांच्या भारिप बहुजन महासंघाचा एक आमदार निवडून आला. या नेत्याला सर्वसामान्य दलित कुटुंबाशी काही देणं-घेणं आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी यांची कार्यशैली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक दलित समाज हा झोपडपट्ट्यातून राहातो, पण एकाही झोपडपट्टीत यांच्या पक्षाची पाटी दिसत नाही. यांच्या भाषणाला गर्दी देखील आरक्षणाच्या लाभाने सधन झालेल्या आणि किमान शिक्षण घेऊन घरात चार-दोन पुस्तके बाळगून असलेल्या कागदी घोड्यांची. ज्यांचा समाजासाठी कवडीचाही उपयोग होत नाही.

बाकीचे नेते आणि त्यांचे पक्ष म्हणजे जिल्हा लिमीटेड कंपन्याच. त्याही एवढ्या फोफावल्या की महाराष्ट्रातील जिल्हे कमी पडतील पण संघटना आणि पक्षांची यादी संपणार नाही. एवढी शकले झालेला हा फक्त बौद्ध समाज. यात चांभार, मातंग आणि इतर दलित, आदिवासींचाही समावेश नाही. ते वेगळच अख्यान आहे. आपल्या स्वतंत्र चुलीमुळे समाजाची वाताहत होत आहे, हे या नेत्यांच्या गावीही नसेल का? समाजाला नेतृत्वाची किती गरज असते हे मोदीने सदोहारण दाखवून दिले आहे. तरीही आपण कोणा एकाचे नेतृत्व मानायला तयार नाही.

हैदराबादच्या औवेसींनी महाराष्ट्रातील मुस्लिम बहूल भाग हेरून तयारी केली आणि आज त्यांचे दोन आमदार विधानसभेत जाऊन धडकले आहे. औरंगाबाद पूर्व आणि सुशीलकुमार शिंदेंची कन्या प्रणितीच्या विरोधात सोलापूर मध्यमधून एमआयएमचे उमेदवार दोन नंबरवर राहिले आहेत. औरंगाबाद पूर्व मध्ये मुस्लिम मते कमी पडली म्हणून नाही तर ही जागाही त्यांची निघाली होती. असा कडवटपणा आपल्यात कधी येणार. ते औवेसी त्यांच्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच विचार सांगतात, यापेक्षा वेगळं काही सांगत नाही. आपल्या बापाचे गुणगाण गाऊन जर ते लोक एकत्र येत असतील आणि ताकद दाखवून देत असतील तर आपण का नाही ? का आपल्या धमन्यांमध्ये आता निळ रक्त उरलं नाही?

नेत्यांची अख्खी फळीच्या फळी, बुद्ध-फुले-शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा ज्ञानाचा झरा आपल्याकडे असताना, आपला माणूस सत्तेपासून कोरडा का राहात आहे? जर सगळे बौद्ध एक झाले तर चांभार आणि मातंग व साळी-माळी-कोळी-आदिवासी-ओबीसी नक्कीच आपल्याकडे धावत येतील. मग कोणाची बिशाद आहे, 'आपल्या' माणसाकडे काणा डोळा करुन पाहाण्याची. हा भाबडा आशावाद नाही, हे जरा काळजीपूर्वक लक्षात घ्यावं.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...