मुख्य सामग्रीवर वगळा

पोलिसांच्या किस्स्यांचा औरंगाबादमध्ये बोलबाला

औरंगाबाद - शहरात नवीन प्रशासकीय किंवा पोलिस अधिकारी आल्यानंतर नव्याचे नऊ दिवस चर्चा होत असते. मात्र औरंगाबाद पोलिस आयुक्त म्हणून अमितेशकुमार रुजू झाल्यापासून केवळ अधिकारी आणि पोलिस खात्यातच त्यांची चर्चा नाही तर, शहरातील प्रत्येक चौकात, नाक्यावर, पानटपरी आणि एवढेच नाही तर ऑफिसमधील लंच टेबलवरही पोलिसांच्या कामगिरीबद्दल बोलले जात आहे.
सर्व सामान्य नागरिकाला पोलिसांचा कायम धाक असतो. पण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आणि सत्ता व पैशांचे बळ ज्यांच्या पाठीशी असते त्यांना कोणीच आपले काही बिघडवू शकत नाही असा समज असतो. तो गैरसमज असल्याची उदाहरणे सध्या शहरात पाहायला मिळत असल्याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा आहे. रस्त्यावरुन डोक्याला काळा कपडा बांधून फिरणारे (चार्ली) पोलिस तर कुतूहलाचा विषय झाले आहेत. कुठे काही चुकीचे दिसत असेल तर हे चार्ली पथक तत्काळ हस्तक्षेप करत प्रकरण वाढण्याला वेळीच रोखत आहे.

भर वस्तीत गांजा कुठे मिळतो, विचारणारा कोण ?
शाळा सुटायला वेळ होता, तेव्हा काही पालक घोळक्या घोळक्याने गप्पा मारत उभे होते. त्यात एक माजी नगरसेवक आले, गप्पांमध्ये सहभागी झाले. बोलण्याच्या ओघात विषय पोलिसांवर घसरला. तेव्हा त्यांनी सांगितले, काल सकाळीच एक माणूस हातात सिगारेट घेऊन आमच्या भागात फिरत होता. प्रत्येकाला तो काहीतरी विचारत होता. विचारत- विचारत माझ्यापर्यंत आला आणि सिगारेट दाखवत 'अरे भाई यहां गांजा कहा मिलेगा' असे विचारू लागला.  तेव्हा मी त्याला माहित नाही असे, उत्तर दिले. पण नंतर मला कळाले की तो माणूस दुसरा-तिसरा कोणी नसून पोलिस आयुक्त अमितेशकुमार होते. हा किस्सा ऐकल्यानंतर निवृत्त प्रशासकीय अधिकारी कृष्णा भोगे यांची आठवण झाली. ते मनपा आयुक्त असताना शहरात असेच किस्से सांगितले जात होते. 
पोलिस आयुक्त गुन्हेगारीचे मुळ कुठे-कुठे आहे याचा शोध घेऊन त्यावरच घाव घालत असल्याची प्रतिक्रिया इतरांनी व्यक्त केली.

'रात्री 10 नंतर हॉटेलमध्ये जेवण मिळत नाही, गाड्याही शिस्तीत लावलेल्या'
बीड बायपास मार्गावर अनेक हॉटेल आहेत तिथे रात्री केव्हाही गेले तरी 'सोय' होते हा अनेकांचा अनुभव. ही परिस्थिती गेल्या काही दिवसांमध्ये राहिली नसल्याचे 'दुःख' अनेकजण बोलून दाखवत आहेत. बायपासवरील हॉटेलवर आता फक्त आणि फक्त जेवणच मिळते. इतर सोयीची ग्राहक विचारणा करु लागले तर वेटर आणि मालक सरळ त्यांच्यासमोर हात जोडतात आणि 'आता, बोलले पुन्हा बोलू नका' असे बजावून ग्राहकांना राग आला तरी सोयीची अपेक्षा आता ठेवू नका असे सांगत आहेत.

एका मित्राने सांगितले मी बाहेरगाववरुन रात्री साडे दहा वाजता औरंगाबादमध्ये आलो. घरी जाण्याआधी जेवण करुन जावे म्हणून नेहमी 'बसत' असलेल्या हॉटेलकडे वळलो,  तर हॉटेल मालकाने घड्याळ दाखवत साहेब, तुम्हाला जेवायचे असेल तर पार्सल घेऊन जा. पण आता आत प्रवेश नाही. थोड्यावेळात हॉटेल बंद होणार आहे, असे सांगून पावणे अकरा वाजता हॉटेलमध्ये येण्यास बंदी घातली. हा बदल चांगला असल्याचेही शेवटी त्याने सांगितले.

गारखेडा परिसरातील एका बारबाहेर नेहमीच वाहनांची गर्दी असायची. अर्धा रस्ता चारचाकी आणि दुचाकींनी व्यापलेल्या असायचा. हा मार्ग वाहतूकीसाठी आहे, की बारच्या पार्किंगसाठी असा अनेकांना प्रश्न पडायचा. येणाऱ्या-जाणाऱ्यांची नेहमीची चिडचिड. मात्र आता रस्त्यावर एकही गाडी पार्क केली जात नाही. कुठे वाहतूक पोलिस नसताना केवळ पोलिसांच्या धाकाने आलेली शिस्त नागरिकांच्या चर्चेचा विषय झाली आहे. बार मालकाने वाहने रस्त्यावर उभी करु नका पार्किंगमध्येच लावा हे सांगण्यासाठी एक सुरक्षा रक्षकच तैनात केला आहे.

'दक्षता न बाळगता काम करणे हा देखील गुन्हाच'
सिडको पोलिस स्टेशनमध्ये एका प्रकरणात गेलो असताना, दैनंदिन जीवनातही किती गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे हे एका पोलिस कर्मचाऱ्याने सदोहरण सांगितले.

एका महागड्या मोबाइल मधील डाटा डिलीट करताना ग्राहकाकडे मोबाइल खरेदीचे बील न मागितल्यामुळे चोरीच्या मोबाइल प्रकरणात एक  मोबाइल दुरुस्ती करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. त्याची वकिली करण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला पोलिस कर्मचारी सांगत होते, साहेब या तरुणाचा काहीही दोष नाही हे आम्हालाही मान्य आहे. पण याच्याकडे एक अनोळखी व्यक्ती महागडा मोबाइल घेऊन येते. त्यातील सर्व डाटा डिलिट करण्यास सांगतला जातो. तेव्हा याला थोडीतरी शंका आली पाहिजे, की कोणीही मोबाइल सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी देतो तेव्हा कॉन्टॅक्ट लिस्टचे बॅकअप घेण्यास सांगत असतो. एवढ्या महागड्या मोबाइलमधील सर्व डाटा का डिलिट करण्यास सांगितला जात आहे. तेव्हा तरी याने बील मागायला पाहिजे होते. चोरीच्या मोबाइलचा डाटा डिलिट करताना याला पकडले त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. अशाच लोकांचा गुन्हेगार फायदा घेतात. 
अशा प्रकरणांमध्ये 'आयुक्त साहेब' फार संवेदनशील आहेत. एका चोरीच्या गाडीची नंबरप्लेट बनवून देणाऱ्यालाही आरोपी करण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले होते. गाडीची कागदपत्रे न पाहाता नंबर प्लेट तयार करणे, हे गुन्ह्याला पूरक काम असल्याचे सांगून आयुक्त साहेबांनी त्यालाही अटक करण्यास सांगितले. यामुळे लोकांनी आपले दैनंदिन काम करतानाही आपल्याकडून चुकीचे काही घडणार नाही ना, याची स्वतःच दक्षता घेण्याची गरज असल्याचे पोलिस कर्मचाऱ्याने निघता-निघता सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...