मुख्य सामग्रीवर वगळा

मनसेची खंडणी, मुख्यमंत्र्यांची 'मुश्किल'

'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद अखेर मिटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोध मागे घेतला आहे. मात्र यामुळे मनसे या खळ्ळखट्याकची भाषा करणाऱ्या पक्षाने माघार घेतली की खरोखर हे त्यांच्या आंदोलनाचे यश आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे एखाद्याला बळजबरी करुन आर्मी वेलफेअर फंडसाठी निधी घेणे, शहीदांचा अपमान आहे. लष्कराचा हा स्वाभिमान योग्य असल्याचे या वादावर शांत असलेल्या शिवसेनेने म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी याला 'खंडणी' हा शब्दप्रयोग करुन मनसे आणि भाजपने एकमेकांना मोठे करण्याचा चालवलेला प्रयत्न एका दगडात हाणून पाडला. 
मनसे 'खळ्ळखट्याक' करणार म्हटल्यावर चांगल्या-चांगल्यांचे धाबे दणाणत होते. राज्य सरकारसह मुंबईतील मोठमोठ्ठे मॉल, चित्रपट निर्माते, कलाकार यांनाही अनेकदा मनसेपुढे झुकावे लागले असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मग मराठी पाट्या असो किंवा मराठी मुलांना रेल्वेतील नोकरीचा मुद्द्दा किंवा नुकताच प्रदर्शित झालेला 'एम.एस धोनी' हा हिंदी चित्रपट मराठीत प्रदर्शित करण्याचा वाद असेल. मनसेचे आंदोलन बहुतेकवेळा त्यांच्या 'खळ्ळखट्याक'च्या भीतीने यशस्वी झालेले आहे. मात्र ज्या चित्रपटाच्या नावातच 'मुश्किल' आहे त्यांनी सर्व 'मुश्किली' दूर करत ऐन दिवाळीच्या तोंडावर मनसेचा फटाका 'फूस' करुन टाकला आहे.
पाकिस्तानी कलाकारांना विरोध करीत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शनाला विरोध केला होता. या चित्रपटात फवाद खान या पाकिस्तानी कलाकाराची भूमिका आहे. त्यासाठी आंदोलनाचीही जय्यत तयारी केली होती. मल्टीप्लेक्समधील कामगारांना हाताशी धरुन चित्रपट प्रदर्शित झाला तर संपाचे हत्यार उपसण्याचाही चंग खोपकरांनी बांधला होता. 28 ऑक्टोबरला हा चित्रपट देशभर प्रदर्शित होणार आहे, त्याआधी एक पडदा चित्रपटगृह मालकांचेही देशप्रेम उफाळून आले होते. मनसेच्या विरोधात सहभागी होत त्यांनी चार राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची घोषणा केली होती.
चित्रपटगृह मालक, मल्टिप्लेक्स कर्मचारी आणि मनसेच्या खळ्ळखट्याकची भीती काचेचे इमले बांधलेल्या मल्टिप्लेक्स चालकांच्याही मनात घर करुन बसली होती. चित्रपट आणि कलाकार हे आपल्या देशात नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिलेले आहेत. त्यांच्याविरोधात काहीही बोलता येते आणि बोललेल्या प्रत्येक बऱ्या-वाईटाला प्रसिद्धीही मिळते. मात्र यावेळी दिग्दर्शक करण जोहर आणि प्रोड्यूसर्स गिल्डने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज'वर जाऊन वाद मिटविला नाही तर त्यांनी सुरुवातीला मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याचे आवाहन केले. त्यानंतर चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरने एक व्हिडिओ पब्लिश करुन पाकिस्तानी कलाकारांना संधी दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यापुढे कोणत्याच पाकड्यांना संधी देणार नाही, असेही अभिवचन दिले. मात्र तरीही मनसेच्या खोपकरांनी वर मान करुन आणि डोळ्याला डोळा भिडवून मोठ्या मनाने विरोध मागे घेतला नाही, उलट बुधवारी एका मल्टिप्लेक्सबाहेर आंदोलन करुन विरोध कसा राहील याचे ट्रेलर दाखवले.
देशवासियांची माफी मागताना करण जोहरने सांगितले होते, की हा चित्रपट फ्लोअरवर गेला तेव्हा भारत-पाकिस्तान संबंधामध्ये सुधारणेचे वारा वाहात होते. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना संधी दिली गेली होती. दुसरे असे की जेव्हा आपले पंतप्रधान चहा घेण्यासाठी कराचीत उतरले आणि पाकिस्तानचे शरीफ पंतप्रधान नवाज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आले, तेव्हाच या चित्रपटाचा मुहूर्त झाला होता. भारताच्या 'उरी' हल्ला झाला तेव्हा चित्रपट पूर्ण झालेला होता. त्यासाठी तीनशे कलाकार आणि तंत्रज्ञांची मेहनत लागलेली होती. कोट्यवधी रुपये त्यासाठी ओतण्यात आले होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ही सर्व मेहनत वाया जाऊ नये, यासाठी करण जोहरचे हात जोडून झाले, पोलिसांच्या पाया पडून झाले मात्र मार्ग सापडत नव्हता.
'ना खाऊंगा ना खाने दूंगा'
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दारात जाऊन करण जोहर माफी मागणार, अशी शक्यता सर्वांनाच वाटत होती, मात्र त्याने तसे केले नाही. तो थेट केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंहाकडे गेला. सोबत प्रोड्यूसर मुकेश भट, केंद्रीय मंत्री आणि बॉलिवूड गायक बाबुल सुप्रियो देखील होते. सुप्रियो यांनी त्याच दिवशी स्पष्ट संकेत दिले की मनसेचा विरोध सरकार मोडीत काढणार. त्याची प्रचिती दुसऱ्या दिवशी झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर खुद्द खोपकरांनीच दिली, आमचा विरोध कायम आहे, आंदोलन लोकशाही मार्गाने केले जाईल, अशी मवाळ भाषा झाली होती. कारण, केंद्रीय मंत्री सुप्रियो यांनी, मनसे गुंडांचा पक्ष असल्याचे म्हटले होते. गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर ज्याप्रमाणे आज मुकेश भट मीडियाच्या समोर आले, गुरुवारीही तेच दिल्लीत माध्यमांना सामोरे आले आणि गृहमंत्री चित्रपट प्रदर्शनाला अनुकुल असल्याचे सांगत, संरक्षण देण्याचे मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले होते.
तेव्हाच स्पष्ट झाले होते की मनसेचा विरोध चिरडून टाण्याची तयारी सरकारने केली आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत हे स्पष्ट झाले नाही, की करण जोहर या साळसूद चेहऱ्याला गृहमंत्र्यांना भेटण्याची भन्नाट कल्पना कुठून सुचली, की राज्यातूनच कोणी सुचविली ?
असो, आता मनसेचा विरोध मावळल्यानंतर काँग्रेसने याला भाजप - मनसेमधील तोडपाणी म्हटले आहे. खरच मनसे तोडपाण्यासाठी असा विरोध करीत असेल का? तसे असेल तर मग ही नेहमीची तोडपाणी बंद करण्यासाठीच करण जोहर आणि प्रोड्यूसर्स गृहमंत्र्यांच्या भेटीला गेले नसतील कशावरुन. कारण पंतप्रधानांनी म्हटलेलेच आहे 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा..' याची आठवण कदाचित करण जोहरला झाली असावी.
मनसेचे अस्तित्व लयाला चालले आहे का ?
आता सर्व राजकीय पक्ष नगरपालिकांची तयारी करीत असताना बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतून तयार झालेल्या राज ठाकरेंच्या मनसेची कुठेही चर्चा नाही. शिवसेनेने स्वबळाचा शंख फुंकला आहे तर, काँग्रेस राष्ट्रवादीही जिल्ह्या-जिल्ह्यातील नेतृत्वावर निर्णय सोपवून लढण्याची तयारी करीत आहे. भाजपने तर आम्ही सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ असे जाहीरच करुन टाकले आहे. या सर्व चर्चेत मनसे नेहमीच मागे पडत चालली आहे. त्यांची चर्चा फक्त मराठी सिनेमांना प्राइम टाइम मिळाला पाहिजे. मुंबई आणि आसपासच्या निवडणुका लागल्या की मराठी पाट्या लागल्या पाहिजे. टोलचा प्रश्न भाजप सरकार आल्यापासून जणू निकाली निघाला आहे. त्यामुळे तात्कालिक प्रश्नांवर राण उठवणे एवढेच काय मनसेचा सध्याचा मुद्दा दिसत आहे. त्यातही पब्लिसिटी कशात आहे, तेच प्रश्न त्यांना महत्त्वाचे वाटताना दिसतात.
आता राहिला मुद्दा, 'ऐ दिल'च्या प्रदर्शनाचा, तर 28 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याआधी उरी या लष्करी तळावर शहीद झालेल्या 18 जवानांना चित्रपट श्रद्धांजली वाहणार आणि नफा हो किंवा तोटा आर्मी रिलिफ फंडामध्ये 5 कोटी रुपये जमा करणार आहे, हे मनसेच्या आंदोलनाचे यश असल्याचे राज ठाकरेंनी शेवटी स्वतःच्या घरात येऊन सांगितले. आत हे यश आहे की यशस्वी माघार हे तमाम जनतेला चांगले कळते.
(पूर्व प्रसिद्धी www.divyamarathi.com दि. २२ ऑक्टोबर २०१६)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...