मुख्य सामग्रीवर वगळा

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

१७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले.

राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे कोणता व्हिडिओ लावणार आणि मोदी सरकारची किती फाडणार याची सर्वांनाच उत्सूकता लागून राहिलेली असते. आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपले आणि राज यांची या निवडणुकीतील मुंबईतील पहिली सभा काळाचौकी येथे झाली. यावेळी त्यांनी मुकेश अंबानींचा उल्लेख करुन भाजपवर बाऊंसरच टाकला आहे.
राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आणली होती. त्यांच्या या ब्ल्यू प्रिंटची तेव्हा सर्वच माध्यमवीरांनी खिल्ली उडवली होती. मात्र त्यातून एक नव्या धाटणीचा विचार करणारा नेता निर्माण होत आहे, असा आशावाद कोणीही व्यक्त केला नाही. यंदाच्या लोकसभेत राज यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे मोदी-शाह जोडीवर फोकस ठेवून त्यांच्या पाच वर्षातील कामाची लक्तरेच वेशीवर टांगण्याचा जाहीर कार्यक्रम हाती घेतल्याचे आपण पाहात आहोत. यासाठी ते एखाद्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये प्रेझेंटेशन द्यावे तसे आपले भाषण सादर करत आहे. एक-एक व्हिडिओ दाखवून त्याबद्दल ठाकरी शैलीत मोदी सरकारचे वाभाडे काढत आहेत. विशेष म्हणजे ४८ लोकसभा मतदारसंघ असलेल्या महाराष्ट्रात राज यांनी मोजून १० सभा घेण्याचे ठरवले आहे. त्यात त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार नाही, तरीही त्यांच्या सभांना होणारी गर्दी ही चढत्या क्रमाचीच राहिली आहे.
राज ठाकरे यांनी नांदेड येथील पहिल्या सभेत मोदींच्या डिजिटल इंडियाची पोलखोल केली. त्याबद्दलचा व्हिडिओ त्यांनी सभेत दाखवला. हरिसाल गावातील गावकरी, या गावाचा मॉडेल याची सध्याची परिस्थिती त्यांनी नांदेडच्या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशाला दाखवली. यानंतर सोलापूरच्या सभेत या गावातील मॉडेलच समोर आणून मोदी सरकारचे दात घशात घातले. राज यांच्या आरोपांना उत्तर तरी कसे द्यायचे याचा फक्त विचारच भाजपचे धुरीण करत बसले. तोपर्यंत राज यांच्या भाषणाचे व्हिडिओ विविध भाषांमधून देशभर पोहोचत होते. डिजिटल गावानंतर मुरबाडमधील धसई या सरकारच्या लेखी कॅशलेस गावाचा कारभार कसा फक्त कॅशवरच अवलंबून आहे हे राज यांनी त्यांच्या पुढील सभेत दाखवले.
जवानांच्या नावावर, एअर स्ट्राईक करणाऱ्या वैमानिकांच्या नावावर मोदी मतं मागत आहेत, मात्र यांच्याच नाकर्त्या धोरणांमुळे काश्मिरमध्ये जवान कसे मार खात आहेत, याचा व्हिडिओ दाखवून राज यांनी जनतेच्या मानात मोदी आणि त्यांच्या सरकारबद्दलची चीड आणखी वाढवली. १४ फेब्रुवारीला ४० जवान शहीद झाले. या जवानांच्या घरातील चुलही पुढील काही दिवस पेटली नसेल मात्र पंतप्रधान मोदी १५ ते २२ तारखेपर्यंत कोणकोणत्या ड्रेसमध्ये कोणकोणत्या हास्यमुद्रा देत होते, याचे सविस्तर फोटो फिचर द टेलिग्राफने दिले होते. या दैनिकाचे कात्रण दाखवून राज यांनी मुंबईच्या सभेत 'हा कसला फकीर हा तर बेफिकीर पंतप्रधान' म्हणून मोदींचा समाचार घेतला. राज यांच्या फकीरावरील कॉमेंटवर मुंबईकरांनी दिलेला प्रतिसाद हा प्रातिनिधीक म्हणता येईल. कारण घरी बसून आपापल्या टीव्ही स्क्रिनवर राज यांचे भाषण पाहाणाऱ्या आणि ऐकणाऱ्या महाराष्ट्रातील कोट्वधी जनतेचाही तोच प्रतिसाद असणार यात शंका नाही.
मुंबईतील पहिल्याच सभेत राज ठाकरे यांनी मुकेश अंबानी यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना दिलेल्या पाठिंब्याचा ज्या प्रकारे उल्लेख केला, त्यातून त्यांना काय म्हणायचे आहे ते त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवले आहे. मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरे हे चांगले मित्र आहेत, याचाही उल्लेख राज यांनी केला. त्यांच्या बोलण्यातील बिटवीन द लाईन जनतेला कळली असणारच. अंबानी यांनी देवरांना दिलेल्या पाठिंब्यातून देशात काय वारे वाहात आहे, याचा संदेश गेल्याचेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांची वकृत्वशैली ही महाराष्ट्राच्या जनतेला नवी नाही. रंग-रेषांशी खेळणारा हा माणूस जेव्हा एखाद्याबद्दल बोलतो तेव्हा त्यांचे हातवारेही एका लयीत फिरत असल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. नुकतेच त्यांनी 'हवा नसलेला फुगा कसा असतो... जॅकेटमध्ये फिट बसवलेला हा फुगा आहे' असा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला तेव्हा खरोखर एखाद्या फुग्याला शर्ट-पँट आणि जॅकेट घातल्यासारखे देवेंद्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहिले असणार. ही राज यांच्या शब्दाबरोबरच त्यांच्यातील व्यंगचित्रकाराची दृष्टी आहे.
राज यांच्या भाषणांची अशीच मेजवाणी आता लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मुंबईतील सभांतून मिळत राहाणार आहे. त्याचा जनतेच्या मनावर किती परिणाम झाला हे बरोब्बर एक महिन्याने अर्थात २३ मेला आपल्याला कळेलच. तोपर्यंत 'लाव रे तो व्हिडिओ'...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...