मुख्य सामग्रीवर वगळा

मी गर्दीशी बोलतोय....


रोजचा दिवस नवा, हे प्रत्येकालाच माहित आहे. त्यात मला सांगण्यासारखे वेगळे असे काही नाही. आजचा दिवसही कालच्या सारखाच गेला. रोजच्या नियमाप्रमाणे ऑफिसमध्ये आलो, ऑफिसामध्ये मला नेमून दिलेले काम पूर्ण केले आणि आता घरी जायची वेळ टळून गेली आहे. बरेच दिवस झाले ब्लॉगवर काही अपडेट दिल्या नाही म्हणून हा प्रपंच.
आता मी मुंबई सोडून आठ-नऊ महिने झाले आहेत. आता मी माझ्या मुळ गावी म्हणजे औरंगाबादमध्ये आहे. एवढ्या दिवसांनी मी लिहित आहे, म्हणजे मुंबईत मुबलक वेळ होता असा त्याचा मुळीच अर्थ नाही.
मुंबईतील पूर्णवेळ हा ऑफिससाठी होता. कारण तिथे मी ऑफिस संपल्यानंतर घरी जाऊन काय करु ? असा प्रश्न माझ्या समोर उभा राहात असे. (कधी कधी नरिमन पॉईंट - मंत्रालयाकडे चक्कर मारायला जायचो. तेवढाच काय तो विरंगूळा) त्यामुळे वाचन ब-यापैकी वाढलं होतं. हा ही त्या वेळेचा मला फायदा झाला. इथे म्हणजे औरंगाबादला मात्र ऑफिस व्यतीरिक्त अनेक कामे असतात, त्यामुळे कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर घरची आणि इतर काही महत्त्वाची कामे उरकण्यात दिवस निघून जातो आणि दुसरा दिवस उजाड़तो.
पण, मी ही सर्वांचीच (कदाचित नसेलही. असे सन्माननीय अपवाद वगळून) बोरींग कहानी का रिपिट करीत आहे. तर असो...
एवढा वेळ झेलले त्या सर्वांना धन्यवाद. पुढेही आपले सहकार्य लाभेल असे गृहित धरतो. हे 'गृहित' राज ठाकरे सांगतात त्या प्रमाणेच बरका. उगाच ताकाला जाऊन भांडे लपवायला नको. (ही सगळी मंडळी तुम्हाला गृहित धरतात. आपलीच माणसं आहेत. जाणार कुठे. कसंही वागवलं, कितीही त्रास झाला तरी मते आपल्यालाच देणार. असं गृहित धरतात. इति राज ठाकरे)
आता या राज ठाकरेंनी मुंबईचा 'किंग मेकर' मी असणार अशा खूप बाता मारल्या मात्र मुंबैकरांनी 'काका'ला अर्थात बाळासाहेब ठाकरेंना पुन्हा एकदा ही २१ हजार कोटी की काय ते, कोंबडी बहाल केली आहे. (आपल्याला त्यातले फारसे आकडे तोंडपाठ नाहीत बुवा.) आणि त्यांनीही ती काखोटीला मारून मिळवून दाखविलाचा 'गजर' सुरु केला आहे. या ठाकरे कुंटूंबाच्या कौटूंबिक भांडणात पवारांच्या घड्याळाचा गजर फक्त पिंपरी-चिंचवडमध्येच झाला. बाकी मुंबैकरांनी काँग्रेसला नेहमीप्रमाणे 'हात' दिला. दिल्लीवरुन आऊटसोर्स केलेले पृथ्वीराज चव्हाण यांना अजून काही हा मुंबै आणि महाराष्ट्राचा खेळ कळालेला दिसत नाही. तसे पृथ्वीबाबा तंत्रज्ञानात अतिशय हुषार पण या महाराष्ट्राचे तंत्रच वेगळे आहे त्याला ते तरी काय करतील बिचारे . हे एकटेच काय ते विकासाच्या चार गोष्टी मतदाराच्या गळी उतरवत होते. बाकी अजित पवार त्यांना दादा म्हणण्याची प्रथा आहे ती टाळून, त्यांनी मुंडेंमागे घरचेच लचांड लावून दिले. मुंडे बिचारे दिल्ली , मुंबै , उर्वरीत महाराष्ट्र सोडून बीड आणि त्यातही परळीत मुक्काम ठोकून बसले. त्यांना या धाकल्या पवारांनी मानसिक संतूलन बिघडल्याचेही प्रमाणपत्र देऊन टाकले. आता मराठवाड्यातील माणसाला बोलल्यावर माझ्यासारख्या दुस-या मराठवाड्यातील माणसाला पक्ष-बीक्ष बाजूला ठेवून वाईट वाटतचं. पण वाटून करणार काय 'सौदा'च सारा. रामदास आठवलेनी नाही केला, शिवसेनेबरोबर दलित मतांचा सौदा.
या सौद्याच्या भाजीची शिवसेनेला काही चव आली नाही मात्र रामदास आठवले आपली चव घालवून बसले. काय ती शेरो शायरी, काय त्या कविता. नुसतं ट ला ट , प ला प. काहीही असो, त्यांच्यातील कवीला खासदारकी गेल्यानंतर नॅशनल स्टेज मिळाला नव्हता, तो उद्धव ठाकरेंनी एमएमआरडीएचा मिळवून दिला, आणि हक्काचा प्रेक्षकही. आता या पुढे शिवसेना त्यांना कशी ट्रिटमेंट देते हे पाहावे लागेल.
तर मी काय सांगत होतो. हं , राज ठाकरे. राज ठाकरे हे मुंबईत नाही पण जवळच्याच नाशिकमध्ये किंग मेकरची भूमिका निभावणार आहे. नाशिकमध्ये राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन सगळ्यांनाच धक्के देत चांगलेच धावले आहे. आता ते इथे भाजप आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करतीलही आणि त्यांच्या मनात असलेली ब्लू प्रिंट आपल्याला पहायला मिळेल अशी अपेक्षा महाराष्ट्राने गृहित धरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...