मुख्य सामग्रीवर वगळा

'गड' आला सेनेचा "सिंह" गेला रिपाईचा


रिपब्लिकन पक्षाचे नेत रामदास आठवले यांचा मुंबई महापालिकेत केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. मात्र याच वेळी त्यांनी ज्या दोन पक्षांशी युती केली त्या शिवसेना - भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. भाजप तर मागील निवडणूकीपेक्षा तीनने अधिक आहे. मतदानाची टक्केवारी देखील वाढली आहे. ज्याची भाजपनेत्यांनाही अपेक्षा नव्हती. या सगळ्यावर रिपाई नेते आठवले यांनी नुकतेच मुंबईत भाष्य केले आहे.
गेली अनेक वर्षे आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर होतो. आमची मते त्यांना मिळत होती, परंतु आता आम्ही शिवसेना-भाजपबरोबर आहोत. महापालिका निवडणुकीत मात्र या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्याने आणि आमच्यातही बंडखोरी झाल्याने रिपाइंचे उमेदवार निवडून आले नाहीत, असा आरोप पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी पुन्हा एकदा केला.

मुंबई पत्रकार संघात आयोजित एका कार्यक्रमात शिवेसना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले एकत्र आले होते. याप्रसंगी आठवले म्हणाले की, ‘गड आला पण सिंह गेला’ अशी आमची अवस्था झाली आहे. आमची मते महायुतीकडे वळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो, परंतु या दोघांची (शिवसेना, भाजप) मते आमच्याकडे वळली असती तर आमचे दहापर्यंत उमेदवार नक्कीच निवडून आले असते. रिपाइंच्या दोघांनी बंडखोरी केली, तर यांचे 8 बंडखोर होते. त्यामुळेच आमच्या जागा कमी निवडून आल्या. असे असले तरी आम्ही महायुतीसोबत आहोत आणि यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गेलेली आमची मते विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमच्याकडे वळवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आमच्या जागा कमी झाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आता आठवलेंनी काँग्रेस - राष्ट्रवादीकडे वळालेली मते पुन्हा स्वतःकडे वळविणार असल्याचे म्हटले आहे. मात्र हे बोलण्या एवढे सोपे काम नाही.
मुळात शिवसेनेने रिपाईला सोबत घेण्याचे प्रमुख कारण दलित तरुण मते हे होते. मुंबईतील दलित तरुण हा दिशाहीन झालेला आहे. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व जवळचे वाटत आहे. गेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीत ही मते मनसेकडे वळाल्यामुळेच त्यांचे उमेदवार हे लाखांच्या घरात गेले होते. ही तरुण मते जर मनसेकडे वळू शकतात तर ती शिवसेनेकडे का डायव्हर्ट करता येणार नाही, या दृष्टीने शिवसेना - प्रामुख्याने उद्धव ठाकरे विचार करीत होते. तेव्हा पासूनच ते ही मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यांच्याकडे एकही प्रसिद्ध चेहरा नसल्यामुळे त्यांच्या सभांमधून भीमशक्तीच्या नावाखाली केवळ निळे झेंडे फडकतांना दिसत होते. रामदास आठवलेंच्या रुपाने आंबेडकरी जनतेतील जाना-माना आणि मास लिडर असलेला चेहराच नव्हे तर नेता त्यांच्या गळाला लागला आणि मुंबई महापालिकेत त्यांना या नेत्याचा करिष्माही पाहायला मिळाला. चौथ्यांदा सेना-भाजप युतीला मुंबैची कोंबडी मिळाली आहे.
मात्र याच वेळेस शिवसेनेने रिपाईला दिलेल्या २९ जागांपैकी किती जागा या त्यांच्याकडे नंबर एक आणि नंबर दोनच्या होत्या. याचे उत्तर आहे एकही नाही. या सर्व जागा मागील पालिका निवडणूकीत चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर असलेल्या होत्या. म्हणजे या ठिकाणी सेना-भाजपचे उमेदवारच काय खुद्द उद्धव ठाकरे उभे राहिले असते तरी निवडून आले नसते. अशा जागा रिपाईच्या झोळीत त्यांनी टाकल्या. त्यातही दहा - बारा ठिकाणी शिवसेना- भाजपचे बंडखोर उभे होते. त्यामुळे विरोधी काँग्रेस - राष्ट्रवादी - मनसे बरोबरच रिपाईच्या उमेदवारांना महायुतीच्या बंडखोरांशी लढा द्यायचा होता. यामुळे त्यांची अर्धी शक्ती तिथेच खच्ची झाली. यासोबतच विरोधी उमेदवार आणि बंडखोरांकडे वाहणारा पैशांचा महापूर हा रिपाई उमेदवार कुठून आणणार होता ?
याचाच अर्थ महायुतीच्या नावाखाली सेना-भाजप युतीने आठवलेंच्या रिपाईची पूर्ण मते मिळविली मात्र २९ प्रभागांमध्ये युतीचे एकही मत रिपाई उमेदवारांना पडले नाही.
हा केवळ राजकीय विरोध नाही. यामागे फार मोठे षडयंत्र आहे. रिपाईच्या उमेदवार निवडून आला तर त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही त्यांना जयभीम घालणार का ? उद्या कपाळी निळ लावून तुम्ही फिरणार आहात का ? आणि एकदा का त्यांना निवडून आणले की पुढच्यावेळेसही ते या जागेवार दावा सांगतील तेव्हा तुम्ही त्यांना आडवू शकणार नाही. त्यामुळे आत्ताच यांच्या पायात पाय घाला आणि यांना पाडा. हे मनुवादी षडयंत्र या मागे आहे. याची जाण आठवलेंना नाही असे म्हणणे चुकेचे ठरेल मात्र, आठवले हे संसदीय राजकारणापासून सध्या अलिप्त आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांना जोपर्यंत आमदारकी किंवा खासदारकी मिळत नाही तोपर्यंत तेही कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन देणार नाहीत.
शिवसेना-भाजपने जर मनावर घेतले असते तर रिपाईचे देखील १०-१२ नगरसेवक मुंबई महापालिकेत असते. मात्र त्यांना तसे व्हावे असे वाटतच नाही. त्यांच्या मनातील मनुवाद अजून संपलेला नाही. दलित माणसे मोठी व्हावी ही भावना अजून त्यांच्या मनालाही शिवलेली नाही. आणि जोपर्यंत त्यांच्यातील वर्णव्यवस्थेची मानसिकता, मनुवादी दृष्टीकोण गाडला जात नाही तोपर्यंत सर्वसाधारणच नव्हे तर राखीव प्रभागातूनही रिपाईचा उमेदवार निवडून येणे शक्य नाही.
मुंबईतील पत्रकार परिषदेत आठवलेंनी गड आला पण सिंह गेला असल्याचे म्हटले. पण गड कोणाचा आला आणि सिंह कोणाचा गेला याचा खुलासा केला नाही. हा गड शिवसेनेचा आला आहे. कारण आठवलेंचा गड कधी नव्हताच तो यावेळी येण्याची शक्यता होती. मात्र मनुवादी मानसिकतेने आठवलेंचे ते स्वप्न सत्यात उतरु दिले नाही. मागील वेळेचा आकडाही यंदा आठवले यांचा पक्ष गाठू शकलेला नाही त्यामुळे सिंह गेला एवढे मात्र नक्की. त्यामुळे आगामी काळात (२०१४चे लक्ष्यं समोर ठेवून) स्वतःची क्रिडीबीलीटी वाढविणे हे मोठे काम आठवले आणि इतर रिपाई नेत्यांना करावे लागणार आहे.
आपापले एक एक पॉकेट निर्माण करुन ते मजबूत करणे एवढेच ध्येय आठवलेंसह प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे यांनी केले पाहिजे. बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारखे केडरबेस कार्यकर्ते तयार करणे हे आजच्या घडीतील अवघड काम जर या नेत्यांकडून झाले तर या पुढील काळात दलित चळवळीला दिशा सापडू शकते अन्यथा या निवडणूकीसारखीच अवस्था दलित मतांची आगामी काळातही होईल. आणि गुरे हाकून न्यावी तशी ही मते कोणीही हाकून घेऊन जाईल.

टिप्पण्या

  1. आपले निरिक्षण आणि विश्लेषण वाचून आपल्यातल्या राजकीय विश्लेषकाची आज ओळख झाली...छान

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...