मुख्य सामग्रीवर वगळा

आई असल्यावर जाणवत नाही


आई असल्यावर जाणवत नाही


एकटाच असलो की, मनावर अनाहूत काजळी पसरते. मग चार भिंतीचं सुरक्षा कवच असलेल्या घरात, जर्नालिझमच्या हॉलमध्ये, बुद्धलेणीच्या पायथ्याशी, पिंपळाच्या जाळीदार सावलीत मी कुठेही असलो तरी, माझ्या एकटेपणाला सोबत करायला 'आई' हळुवार पावलाने येते. कधी-कधी माणसांच्या मेळ्यात, नात्यांच्या गोतावळ्यात, माझ्या एकाकी मनाची आई सोबती होते. एकटेपणाच्या गर्तेतून आई माझा उजवा हात हाती धरून, डावा हात पाठीवर फिरवून येणा-या प्रत्येक संकटाशी धैर्याने सामोरे जाणाचे बळ देते. त्यावेळी ती खूप काही सांगते. तिला लाभलेल्या छोट्याशा आयुष्यातील ब-या-वाईट अनुभवाचं संचित आई माझ्या पुढयात ठेवेत...

कोजागिरीच्या पिठूर चांदण्यात आईची गोरी कांती अधिकच उजळून निघायची. सर्वांसाठी द्रवणारं तिचं ह्रदय, आजही कळत नाही तिच्या ह्रदयाचा थांग. कुठून साठवलं होतं तिनं एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचं तिच्याशी आपलेपणाचं नातं.

'उपाशीपोटी पाण्याच्या घोटी सपान पडतं
आभाळ झडतं ग आभाळ झडतं'


अशी मनाची अवस्था झाली की, मनाच्याही नकळत मनभर व्यापून राहाते आई; आणि म्हणूनच प्रत्येक सुख-दुःखात मनाला उभारी देणारी असते तिची सोबत, तिची आठवण. आईचा तिच्या लेकरांसाठी असलेला वात्सल्याचा झरा कधीच अटत नाही. दिसामाजी बाळासाठी आईचं प्रेमाचं सिंचन अधिकाधिक वाढतच असतं.

मला आठवतं, एक शेजारीण आईला म्हणाली, 'किती दिवस तुम्ही मुलाला बाळाच म्हणणार आहात?' तेव्हा आईचं उत्तर होतं, 'तो कितीही मोठा झाला तरी माझ्यासाठी बाळच राहाणार आहे.' आज या शब्दातील गहिरेपणा, मार्दव, सच्चाई कळायला लागते व मन मनोमन कबूल करतं की, आईचा बाळ होऊनच आयुष्यभर राहावं. पण नियतीला ते कदाचित मान्य नसावं. म्हणूनच...

पण आईच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. आजही एकांतात रुतलेल्या माझ्या मनाला, मला तिचाच हात धरुन वर आणतो. प्रकाशाच्या वाटेवर नेतो.

'आई असल्यावर जाणवत नाही
नसल्यावर नाही म्हणवत नाही'


कारण, आई असते मनात मन भरून राहिलेली आणि घर भरून सुद्धा.

आई नसल्यावर नाही म्हणवत नाही.
साभार- दैनिक लोकमत युवामंच

(आज माझ्या आईचा - आशाबाई रमेश खंडागळे १६ वा स्मृतीदिवस आहे. त्यानिमीत्त हा मीच माझ्याशी साधलेला संवाद. हे स्फूट की, ललित माहित नाही, पण जेव्हा मी हे लिहिले(२००४ किंवा २००५ मध्ये), तेव्हा मी पत्रकारितेचा विद्यार्थी  आणि लोकमत युवामंचचा विद्यापीठ प्रतिनिधी होतो. त्याकाळातील माझ्या लिखाणाला युवामंच हे हक्काचे व्यासपीठ होते. त्यांचे विशेष आभार, त्या प्रोत्साहनामुळेच मला माझ्या मनातील भावना कागदावर उतरविण्याचे धाडस आले. )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...