मुख्य सामग्रीवर वगळा

औरंगाबाद मनपा निवडणुकीचा बाजार रंगणार, आपण २२ जागा तरी जिंकणार का?

लोकसभा-विधानसभेनंतर औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची निवडणूक आली. रोजच्या जगण्याच्या लढाईचे प्रश्न (जन्म-मृत्यू नोंदीपासून रस्ते, पाणी, स्वच्छता आणि बरेच काही )जेथून सुटले पाहिजे त्या पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. वार्ड आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची आणि मतदारांची फोनाफोनी सुरु झाली आहे. आता औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीची रंगत पाहाण्यासारखी राहाणार आहे. वार्डांची संख्या वाढून ११३ वर गेली आहे. ११३ वार्ड झाल्यानंतरही अनेक दिग्गजांची निवडणूक लढण्याची आणि लढले तरी जिंकण्याची संधी हुकली आहे. त्याचे कारण म्हणजे वार्ड आरक्षणाने या दिग्गजांचा पत्ता कापला आहे. त्यामुळे अनेक नवे चेहरे पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.

भाजपची (एनडीए) केंद्रात तर भाजप-सेनेची राज्यात सत्ता आहे. औरंगाबादला युती होते की नाही हे अजून ठरायचे आहे. काँग्रेसचे नेहमीप्रमाणेच गोलमाल वातावरण तर, राष्ट्रवादी किती जोर लावते हे पाहाणे औत्सूक्याचे ठरणार आहे. औरंगाबादमधूनच महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केलेला 'एमआयएम' हा फॅक्टर किती प्रभावी ठरतो याकडे केवळ औरंगाबाद आणि मराठवाड्याचे नाही तर महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. औरंगाबाद जशी मराठवाड्याची राजधानी, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र बनले आहे त्यासोबतच हे शहर चळवळीसाठीही ओळखले जाते. मराठवाडा विकास आंदोलनापासून, विद्यापीठ नामांतर, भूमीहीन शेतमजूरांचे आंदोलन, रेल्वेसाठीचे आंदोलन आणि आता पाण्यासाठीचे आंदोलन हे शहर अनुभवत आहे.

आंदोलनाची पार्श्वभूमी असलेले सर्वच रिपब्लिकन पक्ष, बीएसपी, भारिप-बहुजन महासंघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि विविध संत, महात्म्यांच्या नावाने सुरु झालेल्या संघटना-फोर्स देखील पालिका निवडणुकीत रंग भरतील. दुसरीकडे अपक्ष आणि बंडोबा देखील दंड थोपटून पालिकेच्या अखाड्यात उतरणारच. काही वार्डांमध्ये बहुरंगी लढत देखील पाहायला मिळू शकते. या सर्व धामधुमीत महत्त्वाची बाब म्हणजे ११३ पैकी २२ वार्ड हे अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. यात समर्थनगर सारखा उच्चभ्रूंची वसाहत असलेला वार्ड देखील आहे. या २२ वार्ड पैकी आंबेडकरी विचारधारा मानणार्‍या पक्ष - संघटना किती वार्डवर कब्जा मिळवितात हे महत्त्वाचे आहे.तुम्हाला वाटत असेल की मी या २२ वार्डचाच का विचार करत आहे. तर मित्रांनो औरंगाबाद हे चळवळीचे केंद्र असले तरी येथे कोणत्याही रिपब्लिकन गटाने आपली पकड मिळविलेली नाही. आपल्या विविध गटातून जे एक्का-दुक्का नगरसेवक निवडून येतात ते देखील स्वतःच्या बळावर. त्यात पक्षनिष्ठा आणि पक्षाच्या कामावर, भूमिकेवर त्यांना मते मिळत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे मी फक्त अनुसुचीत जातीसाठी राखीव २२ वार्डांचा विचार करत आहे. यापैकी १२-१५ वार्डांमध्येही जर आंबेडकरी पक्षाचे उमेदवार विजयी झाले तर तो मोठा विजय राहाणार आहे.

हैदराबादस्थित ओवेसी बंधूंच्या एमआयएम या पक्षाने विधानसभा निवडणूकीत औरंगाबादमधील पूर्व आणि मध्य या दोन मतदारसंघात काँग्रेसला संपुष्टात आणले आणि भाजप - सेनेला विजयासाठी जेरीस आणले होते. मध्यमधून तर एमआयएमचा महाराष्ट्रातील पहिला आमदार विधानसभेत गेला. त्यांना दुसरा विजय मुंबईतून मिळाला आहे. या पक्षाने पूर्व मतदारसंघात मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळविली आणि विद्यमान आमदार आणि तत्कालिन मंत्री राजेंद्र दर्डा यांची राजवट संपुष्टात आणली येथून विजयी झालेले भाजप उमेदवार अतुल सावे यांना विजयासाठी मोठी झुंज द्यावी लागली. फक्त पाच ते सहा हजारांच्या फरकाने सावे विजयी झाले. याचाच अर्थ मध्यमध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी ज्या प्रकारे मुस्लिमांसह दलितांची मते मिळविली ती मिळविण्यात जर एमआयएम उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यशस्वी झाले असते तर, येथेही एमआयएमला विजय मिळाला असता. मात्र कदाचित डॉ. कादरींनाच विजयाची शाश्वती नसावी म्हणून त्यांनी पूर्व मधील दलित वस्त्यांकडे दुर्लक्ष केले तर त्याचवेळी जलील यांनी एमआयएमचे पश्चिममधील उमेदवार आणि पँथर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गंगाधर गाडे यांना सोबत घेऊन मध्य मतदारसंघातील दलित बहुल वस्त्यांमध्ये प्रचार फेर्‍या काढल्या आणि विजयासाठी फक्त तुमच्या मतांची गरज असल्याचे पटवून दिले.

हिच रणनीती महापालिका निवडणुकीत आता आंबेडकरी पक्षांनी वापरली आणि दलित व मुस्लिम मतांची मोट बांधली तर सेना-भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीलाही जड जाईल. एमआयएमचे आमदार जलील यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, की मला आश्चर्य वाटते की औरंगाबादमदील दलितांची संख्या ही स्वबळावर आमदार निवडून आणण्याची असताना अद्याप येथे या समाजाला यश का मिळाले नाही. बौद्धांचे एक्य व्हावे या मताची मी नाही. कारण ही बुरसटलेली कल्पना आहे हे मलाही मान्य आहे. पण जर, आंबेडकरी विचारांच्या पक्षाने निवडणूक विजयासाठी काही रणनीती आखून या २२ वार्डांमध्ये आपापले स्वतंत्र उमेदवार उभे न करता एमआयएम सारख्या पक्षासोबत आघाडी करुन उमेदवार उभे केले तर सर्वांना विजयाची सुवर्ण संधी असल्याचा अंदाज आहे. बीएसपीचा स्वतःचा मतदार असल्याचे नेहमी बोलले जाते पण ते देखील अद्याप महाराष्ट्रात कमाल दाखवू शकलेले नाही. त्यामुळे आपल्या पक्षांनी सकारात्मक विचार करुन विजयाची रणनीती आखून औरंगाबादमधून महाराष्ट्रासमोर जिवंत उदाहरण ठेवण्यास हरकत नाही. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...