मुख्य सामग्रीवर वगळा

दिल्ली विधानसभा : आयात उमेदवार आणि नकारात्मकतेचा भाजपला फटका


दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने विक्रमी (७० पैकी ६७) विजय मिळविला आहे. त्यांच्या विजयाने भाजपचा (७० पैकी ०३) आणि एका अर्थाने मोदींचा अश्वमेध रोखला गेला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या दिल्लीत भाजपला केवळ तीन जागांवर रोखून त्यांच्या गेल्या नऊ महिन्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सत्ता-पैसा-जात-धर्म आणि नकारात्मकता यांच्यापलिकडे मतदार विचार करतात याचा भाजपला नऊ महिन्यात विसर पडला होता. सर्वसामान्यांच्या हिताऐवजी नकारात्मक राजकारणावर स्वार होऊन विजय मिळविता येईल याला भाजप बळी पडली. दुसरीकडे पॅरेशूट उमेदवार किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार करुन स्वपक्षीयांचा रोष ओढवून घेतला, त्याचाच परिणाम त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोगावा लागला.

भाजपमध्ये अंतर्गत लोकशाहीची गरज
राजकीय विश्लेषक डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या मतानुसार, सध्याच्या राजकारणात वचनांची आणि आश्वासनांची परिपूर्ती करणे राजकीय पक्षांसाठी अत्यंत गरजेचे आहे. सत्ता मिळविण्यासाठी जनतेच्या आकांक्षा जागवणे वेगळी गोष्ट आहे आणि त्याची परिपूर्ती करणे वेगळी बाब आहे. 'आप'ने दिल्लीत भाजपपेक्षा आपण अधिक विश्वसनिय असल्याचे लोकांना पटवून दिले. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली देऊन आगामी काळात आश्वासनांची पूर्ती केली जाईल हा विश्वास जागविला. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने विकासाऐवजी आप आणि काँग्रेस विरोधी भूमिका घेतली. त्यांन नकारात्मक प्रचार भोवला.
शीला दीक्षित यांचा कार्यकाळ सोडला तर, दिल्ली हा भाजपचा अभेद्य गड राहिलेला होता. येथे त्यांचे केडर आणि स्थानिक नेते भक्कम स्थितीत असताना पंधरा दिवसांपूर्वी आयात केलेल्या नेत्या किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार घोषित केले. यामुळे पक्षातील नेते आणि कार्यकर्ते दोन्हींची नाराजी मोदी आणि शहांनी ओढवून घेतली. अण्णा हजारेंच्या अंदोलनातून पुढे आलेले केजरीवाल आणि किरण बेदी यांच्यातच लढत लावल्याने जनतेनेही भाजपकडे पाठ फिरवली. सत्तेसाठी नेते कोणत्याही पक्षात जातात, याचा रोष तरुण मतदारांनी मतदानातून व्यक्त केला.
दिल्लीच्या निकालाने भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांत संपुष्टात आलेली पक्षांतर्गत लोकशाहीची गरज अधोरेखीत झाली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते राज्यांमधील ज्येष्ठ नेते, स्थानिक पातळीवर काम करणार्‍यांच्या विचारांना स्थान द्यावे लागणार आहे.

छोट्या पक्षांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न जनतेला रुचला नाही
राजकीय विश्लेषक जयदेव डोळे यांच्या मते, भाजपचा दिल्लीतील पराभव हा या पक्षाने छोट्या पक्षांना चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न चालविला होता, त्याला उत्तर आहे. दिल्लीतील मतदारांना भाजपची ही चाल पसंत पडलेली नाही. जो विकास भाजप आणि काँग्रेसला अपेक्षीत होता त्या विकासामुळे बाजूला फेकला गेलेल्या समाज घटकाचा संताप म्हणजे 'आप'ला मिळालेला प्रचंड विजय आहे. गेल्या 15 वर्षांत गरीब व कष्टकरी यांच्याकडे फक्त आप आणि त्यांच्यासारख्या संघटना व कार्यकर्ते लक्ष देत होत्या. त्यांच्या कामाची पावती या निकालाने दिली आहे.

भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करतान डोळे यांनी सांगितले, नरेंद्र मोदी यांना अहंकाराची बाधा झाली होती. अमित शहांसारख्या माणसाला पक्षाध्यक्षपदी बसवले. त्यांनी सर्व बाजूने दुबळा असलेल्या आपला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याजोडीला घरवापसी, रामजादे-हरामजादे, हिंदू-मुस्लिम तणाव. यामुळे विकासाऐवजी धर्माधिष्टीत राजकारण भाजप करत असल्याचा अनुभव दिल्लीकरांना येत होता. त्याचा राग त्यांनी फक्त तीन जागा त्यांच्या पदरात टाकून केला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते लोकशाहीच्या दृष्टीनेही हा निकाल महत्त्वाचा आहे. जनतेचे राजकीय शहाणपण सिद्ध करणारा हा निकाल आहे. आपला मिळालेली मते ही सर्व थरातील आणि जाती-धर्मांची आहे. त्यामुळे जात-धर्म-पंथ यांच्यापलिकडे लोक विचार करतात हे दिल्लीकरांनी दाखवून दिले आहे. जनतेला नवा पर्याय हवा होता आणि तो त्यांनी निवडला आहे.

(divyamarthi.com वरुन साभार)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...