मुख्य सामग्रीवर वगळा

किती ही मळमळ

रिमझिम पावसात दोघं शांत चाललेले असतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांनी धरलेला अडोसा एका वळणावर थांबतो. रिमझिम पावसांच्या सरीने दोघेही नक्षिकांत चिंब झालेले. तो हातातील वह्या पुस्तकं डोक्यावर धरून तर ती ओढणी डोक्यावर व्यवस्थीत करत हातात असलेलं 'एनहिलेशन ऑफ कास्ट' डोक्यावर धरून झपझप पावलं उचलायला लागते. रिमझिम पावसात एकमेकांसोबत चालून आता 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालेला असतो पण तिच्या तोंडातून चकार शब्द निघालेला नाही. आता त्याच्या तगमग अधिकच वाढलेली... ही का बोलत नसेल. कशाचा राग.. की कोणासोबत बिनसलं आज... की आपल्याकडूनच एखादा वेडावाकडा शब्द निघाला असेल... एक ना दोन तो दिवसभरातील सगळ्या घटना आठवायला लागतो... अखेर पाऊस थांबतो आणि त्याच्या ओठांना शब्द फुटतात...

सखे... काय झाले काय नेमके. का एवढी शांत आहे. वाटलं होत पावसामुळं थिजले असतील तुझे शब्द... पण जरा वेगळच प्रकरण दिसतयं... कोणासोबत काही बिनसलं का? की माझचं... काही चुकलयं... नाही रे... तुझं काही नाही चुकलं आणि तुझं चुकलं असतं तर एवढं शांत राहून सोडलं असत का तुला! आपलं काही चुकलं नाही हे कळाल्यावर त्या भोळ्या सांबाला जरा आवसान आलं. मग त्याच्या विचारण्यात जरा जोर आला... अगं मग झाल तरी काय का एवढी शांत झाली...

अरे, तो माधव म्हणाला दलितांनो अभिनंदन... काय राष्ट्रपती पदावरही आता यांना पिढीजात आरक्षण हवं आहे का? सोशल मीडियावर तर जणू यांच्यातील मळमळ त्या गंगेसारखी दुथडी भरून वाहात आहे. तरी, बरे एका संघीय दलिताची यांनी निवड केली. पण दलित म्हटले की स्वातंत्र्यांच्या इतक्या वर्षानंतरही एवढी मळमळ अजूनही यांच्या मनात आहे? मला तर वाटतं 2022 मध्ये येणारा राष्ट्रपती त्या राष्ट्रपती भवनाची शुद्धी करुनच प्रवेश करेल !

सखे, असं कसं म्हणते... सगळेच सारखे नसतात. अरे, नाही यांची भावना राष्ट्रपती भवन बाटल्याचीच आहे. यांच्या मनातील जळमटं अजूनही गेलेली नाहीत. आजही मी दलितांच्या घरी जेवतो, हे सांगण्यात यांना काय भूषणावह वाटतं माहित नाही तुला. पेपरात फोटो छापून आणले जातात. ट्विटर-फेसबुकवर जेवणात काय-काय मेनू होता याचे रसभरीत वर्णनं लिहिली जातात. म्हणजे माणूस म्हणून अजूनही दलितांना हे मान्य करायलाच तयार नाहीत का? बरे तरी ते कोविंद संघीय दलित आहेत.. आंबेडकरवादी दलित नाहीत. पण एखादी व्यक्ती दलित म्हटलं की त्याचे काही कतृत्व मान्यच करायचे नाही का?  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...