मुख्य सामग्रीवर वगळा

स्मारकाचे राजकारण आणि आपण

महाराष्ट्र आणि देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकरण करणा-यांची कमी नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हजारो कार्यकर्ते हे आंबेडकरी विचारधारेने वेगवेगळ्या पक्षात, संघटनांमध्ये, संस्थामध्ये काम करतात. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि त्यांच्या पोटाखाली गेलेले रामदास आठवले यांचा गट. यांच्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष व रिपब्लिकन पक्षाचेही शेकडो गट राज्यात कार्यरत आहेत. त्यांची यादी इथे देणेही शक्य होणार नाही एवढी त्यांची संख्या आहे. 

एवढ्या विविध पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांमध्ये कार्यरत असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांचे राजकारण हे एकाच नावाभवती फिरत आले आहे. ते म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १९५६ च्या डिसेंबरमध्ये बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. तेव्हापासून आता २०१२ म्हणजे तब्बल ५६ वर्षात बाबासाहेबांच्या नावाने सर्वच पक्षांनी राजकारण केले आहे. बहुजन समाज पक्षाला सोडल्यास इतर कोणत्याही दलित पक्षाला सत्ता संपादन करता आलेली नाही. मात्र, बाबासाहेबांच्या नावाने काँग्रेसपासून आता आताच्या मनसेनेही मते मागण्याचे काम नेटाने केले आहे, आणि त्यांच्या पदरात या जनतेने भरभरून दानही टाकले आहे.

बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी गेल्या वर्षी अचानक इंदु मिलचा ताबा घेण्यात आला. हा ताबा घेणारे कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते नव्हते. तर ते होते बाबासाहेबांचे नातु आनंदराज आंबेडकर. आता त्यांची रिपब्लिक सेना सर्वांना परिचीत झाली आहे.  ६ डिंसेंबर २०११ आधी या व्यक्तीला महाराष्ट्रच काय पण मुंबईतही किती लोक ओळखत होते हे सांगणे अवघड आहे. (पण, हा बाबासाहेब आंबेडकर या नावाचा करिष्मा आहे की, जो कोणी हे नाव घेईल त्याला लोक ओळखायला लागतात.)  मात्र, त्यांनी इंदू मिल बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यात यावी ही मागणी आक्रमकपणे मांडली. आंबेडकरी जनतेतील हा आक्रमकपणा त्यांनी काळ आणि वेळ हेरुन शोधला. सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर आलेला नीळासागर रोखणे स्कॉटलंड यार्डनंतरचा क्रमांक असलेल्या मुंबई पोलिसांच्या बापाला रोखणे शक्य होणार नाही हे त्यांना माहित होते, आणि हिच वेळ साधून त्यांनी मिलचा ताबा घेतला. कित्येक दिवस तिथे आंबेडकरी जनता आणि बौद्ध भिख्खूंनी ठाण मांडले. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळेल असे आश्वासन दिले आणि यांनी तिथून बस्तान हलविले. दरम्यान, या सर्व आंदोलनामुळे आनंदराज हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. हे नवे नेतृत्व आंबेडकरी चळवळीत उभे राहात आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या रिपाईच्या इतर नेत्यांनीही इंदूमीलच्या जागेचा राग आळवण्यास सुरुवात केली. त्यासाठी दिखाऊ आंदोलनेही खूप झाली. त्यासोबतच या आंदोलनामुळे उभे राहात आसलेले आनंदराज यांचे नेतृत्व २०१४ च्या निवडणूकीत आणि आगामी  काळात आपल्यासाठी अवघड ठरणार आहे हे लक्षात आल्याने, त्यांनी हे आंदोलन काँग्रेस पुरस्कृत असल्याच्या वावड्या उठवल्या. मात्र, त्याच वेळी ते विसरले की, बाबासाहेंबांच्या चैत्यभूमीसाठी तेव्हा सुर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडरकरांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यांच्या परिश्रमातूनच आजची चैत्यभूमीची वास्तू उभी राहीली आहे. त्याच सुर्यपुत्राचा हा वारस आहे. मग त्यांनीही वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी पुढे आले तर रिपाईच्या इतर नेत्यांनी बाबासाहेबांचे उतराई होण्यासाठीतरी या आंदोलनापूरते का होईना त्यांचे नेतृत्व मान्य करण्यास काय हरकत होती?

आज मुख्यमंत्री चव्हाण, काँग्रेसचे नेते आणि मंत्री राजीव शुक्ला यांनी इंदू मिलची जागा ही बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली जाईल. तिच्या हस्तांतराची कारवाई लवकरच पूर्ण होईल, अशी दिल्लीत घोषणा केली. त्याआधी त्यांची वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांच्यासोबत बैठक झाली.  संसदेचे आधिवेशन सुरु असल्याने त्यांना घोषणा करता आली नाही की, उद्या म्हणजे ५ डिसेंबरला संसदेत याबाबतची अधिकृत घोषणा होईल.  मात्र, बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे, आणि त्याचे ९० टक्के श्रेय हे आनंदराज यांनाच आहे. तसा हा निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) काळातच झाला होता. असा खुलासा भारिप बहुजन महासंघाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे या जून्याच निर्णयाची घोषणा केवळ युपीएच्या कारभा-यांनी केली आहे. मात्र, त्यांना ही घोषणा करायला लावणेही अतिशय जिकरीचे होते.

त्यामुळे आता बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणा-यांनी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, आपल्या विभक्तपणाचा इतर लोक फायदा घेत आहेत. बाबासाहेबा आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर हेच आपल्याला तारू शकतात.  आपण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी वेगळ्या चुली केल्या मात्र, त्यावर भाकरी दुसरेच शेकत आहेत. त्यामुळे आपल्या चुलीवर आपणच भाकरी शेकावी आणि आपणच खावी. भलेही तुम्ही वेगवेगळ्या नावाने गटाने राजकारण करा पण, निवडणूकीच्या काळात आणि निर्णायक क्षणी एक व्हा आणि आपली ताकद दाखवून द्या.

जयभीम. 

टिप्पण्या

  1. बाबासाहेबांच्या नावाने महाराष्ट्रातील राजकारण अचानक बदलते याची जाण आंबेडकरी नेत्यांनी घेणे गरजेचे आहे एकीचे बळ काय आहे ? हे बघणे हि गरजेचे आहे तुम्ह्च्या एकीमुळे काय होऊ शकते हे बघून तरी घ्या ? एकदा तरी महाराष्ट्राच्या राजकारणाची सत्ता कशी पलटते हे फक्त तुमच्या एकी मुळेच शक्य आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...