मुख्य सामग्रीवर वगळा

तुकारामसाठी गीत लेखन हा माझ्यातील कवीचा गौरव - दासू वैद्य


चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी दासू वैद्य यांनी गाणी लिहिली आहेत. नुकतीच दिव्य मराठी या माझ्या वेबसाईट साठी (दिव्य मराठी मध्ये मी उपसंपादक म्हणून आहे, म्हणून माझी वेबसाईट) त्यांची मुलाखत घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या गप्पांमध्ये त्यांनी चित्रपट आणि संत तुकाराम यांच्यासंबधी बरेच विवेचन केले. यातून दासू सरांचा व्यासंग आणि तुकारामाकडे पाहण्याची दृष्टी ही कळली. ही मुलाखत म्हणजे माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता.  माझ्या अल्पबुद्धीला जेवढे पचले तेवढे या मुलाखतीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवार, १२ मे २०१२ रोजी आमच्या दिव्य मराठीच्या वेबसाईटवर ही मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. 

तुकारामसाठी गीत लेखन हा माझ्यातील कवीचा गौरव - दासू वैद्य

ज्ञानबा-तुकाराम ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुकाराम या चित्रपटाच्या गीत लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुकाराम कळण्यास मदत झाली. तुकाराम हे प्रकरण समजून घेणं तसं फार अवघड आहे. ते कवींचेही कवी किंबहूना कवींचे बाप आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यातील कवीचा गौरव आहे. कारण चारशे वर्षांनंतरही त्यांच्या अभंगासारखी एखादी कविता आम्हाला लिहिता येत नाही, अशी प्रांजळ कबुली दिली आहे 'तुकाराम' या आगामी चित्रपटाचे गीतकार दासू वैद्य यांनी.

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यानिमित्ताने दिव्य मराठी डॉट कॉमने दासू वैद्य यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी चित्रपटाच्या निर्मितीपासून गीत लेखनाचा अनुभव आणि तुकाराम या विषयाने झपाटलेल्या टीम बद्दल ते भरभरून बोलले.

गप्पांना सुरुवात झाली ती चित्रपटाच्या नावापासूनच. चित्रपटाच्या नावात फक्त तुकाराम एवढाच उल्लेख का आहे. म्हणजे संबंध महाराष्ट्रला ते संत तुकाराम म्हणून परिचीत असताना केवळ तुकाराम एवढेच नाव असण्याचे काही खास कारण?

तुकाराम हे संत होते किंबहुना ते महान संत आहेत,  यात आमचे दुमत असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, या चित्रपटातून तुकारामांचा जीवनपट उलगडत जातो. त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर त्यांनी काय भूमिका घेतली, हे सांगण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. त्यांच्या बालपणापासून संत पदापर्यंत पोचण्याचा प्रवास, त्यासोबतच नंतरच्या काळातील त्यांचे अभंग आणि तत्वज्ञान हा संपूर्ण काळ यात मांडण्यात आला आहे. त्यामुळे केवळ संत तुकाराम एवढाच सीमित हा विषय नाही. तर त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास यात आहे.

या चित्रपटाच्या पटकथेविषयी काय सांगाल?

चित्रपटाची पटकथा हाच चित्रपटाचा आत्मा असतो.  प्रशांत दळवी आणि अजित दळवी यांनी अतिशय समृद्ध आणि मजबूत पटकथा लिहिली आहे. ५-६ वर्षांच्या अभ्यासातून ही पटकथा तयार झाली आहे आणि पटकथाच एवढी सुंदर असल्यामुळे त्यातूनच मला गाणी उलगडत गेली.

या चित्रपटात तुकारामांचे अभंग आणि तुमची गीते असा योग जुळून आला आहे, यांचा ताळमेळ कसा साधला?

मी मुळात कवी असल्यामुळे माझ्यातील कवी जपत मी गीत लेखन करत असतो. चंद्रकांत कुलकर्णी आणि मी अनेक वर्षांपासूनसोबत आहोत. तरीही, तुकाराम या चित्रपटासाठी गीत लेखनाबद्दल मला विचारणा झाली तेव्हा, ती माझ्यासाठी जेवढी आनंदाची गोष्ट होती. त्यासोबतच मोठी जोखीम आणि जबाबदारी देखील होती. चित्रपटातील दहा गीतांपैकी चार तुकारामांचे अभंग आहेत तर चार गीतांचे लेखन मी केले आहे. ते करत असताना तुकाराम मला अधिकाधिक उलगडत गेले. चारशे वर्षांपूर्वी तुकारामांनी नाशिकच्या कुंभमेळ्याला 'व्यर्थ सायास' म्हटले आहे. त्या काळात हा माणूस असं कसं म्हणू शकला. हे धारिष्ठ्य त्यांच्यात कुठून आले, असे प्रश्न पडत होते. त्याबरोबरच ते विठ्ठलाचे ही भक्त आहेत.  यातून त्यांची व्याप्ती आपल्याला समजते. हाच तुकारामांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू समोर ठेवून गाणी लिहायची होती.

यातील एक गाणं म्हणजे, माझ्या तुर्तास या कवितासंग्रहामधील कविता आहे. दुष्काळाची परिस्थिती त्या गीतातून मांडण्यात आली आहे. हरिहरन यांनी हे गीत गायले असून, अशोक पत्की यांच्या धीरगंभीर संगीतामुळे हे गाणे अचूक भाष्य करते.

अशोक पत्की आणि अवधुत गुप्ते या संगीतकारद्वयींसोबत एकाच वेळी काम करतांनाचा अनुभव कसा होता?

अशोक पत्की यांचे संगीत हे मेलिडियस, गंभीर अशा प्रकारचे आहे तर अवधुतचा स्वभाव आणि संगीत हे खेळकर, खोडकर, यंग जनरेशनला भिडणारे आहे. त्यामुळे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींनी या दोघांना एकत्र आणले आहे. तुकारामांचे बालपण ते तरुणपणाच्या काळासाठी अवधुतचे संगीत आहे. कारण तुकाराम हे काही लहानपणापासून गंभीर स्वभावाचे नाहीत. ते देखील सर्वसामान्य मुलांप्रमाणे खेळत होते. त्यानंतर तरुण तुकारामांनी वडिलांनंतर उद्योग सांभाळला.  इथपर्यंत अवधुतचे संगीत आहे. यानंतर येतात ते अशोक पत्की. त्यांच्या संगीताचा जो बाज आहे तो या चित्रपटाच्या प्रत्येक सिचूएशनला समरस होणारा आहे.

संत तुकाराम हे विद्रोही संत. त्या काळापेक्षा कितीतरी पुढच्या पिढीबद्दल त्यांनी भा्ष्य केले आहे. त्यांचा हा स्वभाव गीतातून व्यक्त होतो का?

भेदणारे मुळ, आशयाचे कूळ

भाषेचा कल्लोळ, तुकाराम.

या ज्या काही ओळी आहेत त्या तुकारामांचा स्वभाव व्यक्त करणा-याच आहेत. एका प्रतिकाच्या रुपाने त्यांच्यातील विद्रोहीपणही गीतातून डोकावते.

या चित्रपटातील तुमच्या आवडीचे गाणे कोणते?

गाणीतर तशी सगळीच आवडती असतात. मात्र, काहींबद्दल सॉफ्ट कॉर्नर हा नक्कीच असतो. तसा गन्या, मन्या, तुका या गीताबद्दल आहे. अवधुतने या गीताला चाल लावली आहे. तुकारामांच्या बालपणाच्या प्रसंगाबद्दल, त्या काळातील ११ खेळ या गाण्यातून मांडण्यात आले आहेत. खेड्यातील मुलं ही एखादा खेळ खेळायचाय म्हणून घराबाहेर पडत नाहीत तर, ती एक खेळ झाला की दुसरा, मग तिसरा. त्यानंतर थकले की, पोहायला जातील. मग सुरपारंब्या खेळतील, झाडांवरील मोहळ काढतील. अशी खेळांची साखळी या गाण्यात गुंफण्यात आली आहे. अवधुतचंही हे आवडतं गाणं आहे. त्याचबरोबर या गाण्यात कबीराचा दोहा देखील आहे.  मुलं खेळत असतात. तिथून एक फकीर जात असतो, तो हा दोहा म्हणत असतो. असा तो प्रसंग आहे.

तुम्हाला या चित्रपटातून तुकाराम कसे भेटतात?

जगण्याचा पाया, चालण्याचे बळ

विचाराची कळ, तुकाराम

शब्दांचे इमान, अक्षरांचे रान

अभंगाचे पान, तुकाराम

भेदणारे मुळ, आशयाचे कुळ

भाषेचा कल्लोळ, तुकाराम

पुन्हा उगवतो, खोल पसरतो

सांगून उरतो, तुकाराम
साभार दिव्य मराठी वेबसाईट. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...

मोदी-शहा जोडींने का निवडले रामनाथ कोविंद यांना

मोदी-शहा जोडीचा खेळ खरच अगम्य आहे. कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले नाव त्यांनी राष्ट्रपती पदासाठी पुढे केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि शिवसेनेने पुढे केलेले मोहन भागवत, डॉ. एम.एस स्वामिनाथन या सर्वांना बाजूला करत शहांनी पत्रकार परिषदेत रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशचे दलित व्यक्ती, एकेकाळी आएएएस परीक्षा उत्तीर्ण परंतू वकिलीचाच पेशा कायम ठेवणारे भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दोनवेळा राज्यसभा सदस्य आणि सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या कोविंद यांचे नाव पुढे करुन मोदी-शहा जोडीने सर्वांचीच (विरोधकांची) पंचायत करुन टाकली आहे. मोदी आणि शहा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात 2020, 2022 मध्ये हे साध्य होईल किंवा हे ध्येय गाठले जाईल असे सांगतात तेव्हा विरोधक त्यांची खिल्ली उडवतात. अजून 2019 बाकी आहे. मात्र या जोडीने 2019 ची तयारी ही किती आधीपासून केली याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक निर्णयातून विरोधकांना यायला हवी. 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील संपूर्ण दलितांची मते ही भाजपच्या पारड्यात पडण्यास...