मुख्य सामग्रीवर वगळा

करार

२०१३ हे अजून एक नवे वर्ष सुरु झाले. कित्येकांनी अनेक संकल्प केले असतील. (त्याला काहीजण 'संकल्प सोडला' असेही म्हणतात! संकल्प सोडला म्हटल्यावर पुढे त्याचा पाठपुरावा करण्याची गरजच काय, असा प्रश्न मला नेहमी पडतो. असो. ) कॉलेजात असताना अनेक वेळेस सकाळीच उठून व्यायाम करण्याचा संकल्प कित्येक वर्ष नित्यनियमाने केला होता, आणि नित्यनियमाने त्यात विसरही पडत आला आहे. आताही काही त्रास जाणवला की, व्यायाम करण्याचा संकल्प केला जातो आणि जेवढ्या तत्परतेने संकल्प केला जातो तेवढ्याच तत्परतेने तो विसरला देखील जातो. असे नव वर्षाच्या संकल्पांचे आणि माझे आतापर्यंतचे नाते राहीलेले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून संकल्प न करण्याचाच संकल्प केला आहे. मात्र, वरील सवयीप्रमाणे हा संकल्पही मोडीत निघतोच. असो. हे संकल्पाचे प्रवचन कितीही लांबवले तरी लांबतच राहील.

मी स्वतःला बौद्ध धम्माचा अनुयायी समजतो. तसा जन्मानेच बौद्ध असल्यामुळे त्यात मी काही समजण्याचा प्रश्न उरतच नाही. पण, मी बौद्ध आहे म्हणजे नेमका कोण आहे? भगवान बुद्धांचा जयघोष आणि बाबासाहेबांचा विजय असो किंवा उठता-बसता जयभीम. सालाबादाप्रमाणे येणारे १४ एप्रिल(डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), बुद्ध जयंती, नामांतर वर्धापन दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ६ डिसेंबर-बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण, एक जानेवारीला भीमा कोरेगावचा विजय दिन... असे अनेक दिवस मोठ्या थाटात साजरे करणे किंवा यानिमीत्त अभिवादन, श्रद्धांजली निमीत्त या महामानवांसमोर फुल-अगरबत्ती लावून त्यांच्यासमोर नतमस्तक होणे, म्हणजेच मी बौद्ध का ? आता यात महात्मा फुले, सावित्रीबाई, शाहु महाराज, शिवाजी महाराज यांचाही समावेश करुन त्यांच्याही पुढे नतमस्तक होतो. कारण मी स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतो. पण, मी बौद्ध आहे, आंबेडकरांचा अनुयायी आहे. स्वतःला पुरोगामी म्हणवतो तर या सगळ्यांचा माझा काय अभ्यास आहे ? कुठल्याही चर्चेत बोलायला लागल्यावर मी छातीठोकपणे काही मुद्दे मांडेल. पण, त्यांचे विश्लेषण करायचे झाले तर मग उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्याशिवाय पर्याय राहात नाही. त्यातही वेळ कशी मारून नेली याची फुशारकी असते. वास्तविक, त्या क्षणी वेळेने माझ्या कानखाली सनसनीत चपराक दिलेली असते, हे मी सोईस्करपणे विसरतो.

आम्ही प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही त्रिशरण आणि पंचशील स्विकारुन करतो. पण, किती जणांना याचा अर्थ माहित असतो, हा खरा प्रश्न आहे. आता-आता तर असेही वाटायला लागले आहे की, अर्थ माहित असणे ही तर फार पुढची पायरी आहे, आम्हाला पूर्ण त्रिशरण-पंचशील तरी कुठे पाठ असते. जर, या प्राथमिक गोष्टीच मुखोदगद नसतील तर त्यांचा अर्थ आणि आचरण आमच्याकडून केव्हा घडेल. बाबासाहेबांनी हा धम्म जेव्हा आम्हाला दिला, तेव्हाच त्यांनी "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" हा सहज सोप्या भाषेतील ग्रंथ देखील आम्हाला दिला.  माझ्याही घरात हा ग्रंथ आहे. अनेकांच्या असेल. (कालच एक बौद्ध आणि आंबेडकरी साहित्याचे प्रकाशक आणि विक्रेते सांगत होते की, 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकाची रंगीत छायाचित्र आणि काही नवीन मजकूर असलेले काही हजार ग्रंथ ६ डिसेंबरला मुंबईला विक्रीसाठी नेण्यापूर्वीच संपले.) पण, त्याचे वाचन - मनन अजून माझ्याकडून झालेले नाही. हा ग्रंथ वाचण्याचा संकल्पही मी अनेकदा केला. सुरुवातीची काही पाने वाचून हा संकल्पही पूर्णत्वास गेलेला नाही. मी स्वतःला आंबेडकरवादी तसेच आंबेडकर अनुयायी म्हणवून घेत असताना माझी जबाबदारी आहे की, मी बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा वाचली पाहिजे. धनंजय किर आणि खैरमोडे लिखीत त्यांच्या चरित्राची पारायणे नाही, पण किमान एक-दोनदा ते  वाचून झाले पाहिजे. मला माहित असलेले बाबासाहेब हे फक्त इतरांनी केलेल्या भाषणातील आणि गीतांमधील किंवा वृत्तपत्रातील संपादित लेखातील असतात. ही माझ्यासाठी शरमेची गोष्ट आहे. जर मी बाबासाहेब वाचलेच नसतील तर, मी स्वतःला त्यांचा अनुयायी तरी कसा म्हणवून घेऊ शकतो. बाबासाहेबांचे अभ्यासक जेव्हा त्यांच्या विविध पुस्तकातील दाखले देऊन काही सांगतात तेव्हा मला कोणी विचरले की, तु हे वाचले का,  तर आमचे उत्तर असते, बाबासाहेब आमच्या रक्तातच आहेत!  ते इतरांकडून समजून घेण्याची आणि वाचण्याची काय गरज.  यामुळे मी वेळ निभावून नेतो, मात्र माझ्यातील अज्ञान मात्र कायम राहाते.  ही बोचणी मला काही दिवसांपासून बोचत आहे. नववर्षाच्या निमीत्ताने आजपर्यंतची उजळणी केली तर या गोष्टी राहून गेल्याची प्रकर्षाने जाणीव झाली. आता पुढच्या काही दिवसांत किंवा महिन्यात या महत्त्वपूर्ण गोष्टी पूर्ण केल्याच पाहिजे. हा नववर्षाचा संकल्प नाही तर, स्वतःच स्वतःशी केलेला करार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...