मुख्य सामग्रीवर वगळा

थीम पार्क 'आठवले'; उद्धव आठवलेंच्या मागणीला विसरले

चाळीशी. हा शब्द वयोमानाच्या स्वरूपात पाहिल्यास वृद्धत्वाकडे झुकणारा आहे.  काहीजण मात्र, चाळीशीतही विशीच्या जोशात असतात. त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडे. असो.
चाळीशीबद्दल बोलण्यासाठी आजचा ब्लॉग नाही, याचे कारण वेगळेच आहे. माझा आजचा ब्लॉग हा चाळीसावा आहे, (शतकापासून केवळ साठी दूर आहे.)हे प्रकाशित करण्याच्या काही क्षण आधी कळाले आणि त्यासोबतच आजच बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे थोडासा 'योगायोग' हा शब्द आपल्या ब्लॉगवर असावा यासाठी हा खटाटोप. 

तर, आजचा विषय आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या थीम पार्कची कल्पना आणि त्यांच्या नव्या मित्रपक्षाच्या मागणीकडे त्यांनी केलेला कानाडोळा. (याला योगायोग म्हणायचे की नाही हे तुम्हीच ठरवा.) नवा मित्र पक्ष म्हटल्यावर सुज्ञ वाचकांना कळाले असेलच, कोण आहे ते. त्यात तुमचा वेळ आणि माझे शब्द खर्च न करता त्यांची मागणी काय तेच सोंगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम १५ ऑगस्ट पर्यंत सुरू करावे. 

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे शिवसेनेला थीम पार्क करायचा आहे(?).  मुंबई आपल्याला अंदन दिल्यासारखी तिचा आजपर्यंत उपभोग घेतलेल्या शिवसेनेला कित्येक वर्षात या मोक्याच्या जागेच्या विकासाची गरज वाटली नाही. मग आजच यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानेचे स्वप्न कसे पडले ? मुळात ही जागा राज्य सरकारने मुंबई महापालिकेला भाड्याने दिलेली आहे. ती पालिकेने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिली. म्हणजे टर्फ क्लब हे पोटभाडेकरू आहेत. या जागेचा ९९ वर्षांचा करार १९९४ मध्ये संपला असून त्यानंतर त्याला १९ वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. ती मुदत ३१ मे २०१३ रोजी संपली आहे. 

शिवसेना किंवा त्यांची सत्ता असलेली मुंबई महापालिका जागतिक किर्तीचे खरच काही करून दाखवेल यावर कोणाचा विश्वास आहे का? मुंबईतील किती उद्याने मुंबई महापालिकेने लोकोपयोगी ठेवली आहेत. त्यांची कशा प्रकारे काळजी घेतली जाते, हे प्रत्येक मुंबईकर रोजच पाहातो. एवढी वर्ष यांची मुंबईत सत्ता आहे, कोणकोणते रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले आणि कोणकोणत्या वस्त्या दुर्गंधीमुक्त केल्या, याचाही जरा लेखाजोखा शिवसेनेने थीम पार्क आधी जनतेसमोर मांडावा.

शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, त्यांचे दिवा स्वप्न घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घातली की, रेसकोर्सच्या जागेवर (त्यांचे दिवा स्वप्न असलेले) थीम पार्कच झाले पाहिजे. त्यांनी ते केले नाही तर, 'मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळेल' हे त्यांनी आधीच सांगून टाकलेले आहे. राज्याच्या प्रमुख विरोधीपक्षाला सत्ताधा-यांच्या प्रतिमेची किती ही काळजी. (अशा विरोधकांना आणि सत्ताधा-यांना कोणाची नजर ना लागो!)  उद्धव यांच्या स्वप्नातील थीम पार्क झाले, तर माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला आनंदच आहे. (जर तिथे सर्वसामान्यांना सहजासहजी आणि खिशाला परवडणा-या खर्चात प्रवेश मिळाला तर... ) नाही झाले तरी काही दुःख नाही. कारण जे आपले कधी नव्हतेच त्याचे काय दुःख करायचे ! माझा मुद्दा आहे की, ज्यावेळी  मोक्याच्या जागेसाठी शिवसेना मुख्यमंत्र्यांचे दार झिजवायला कमी करत नाही, त्याच वेळी त्यांचा मित्र पक्ष असलेल्या रिपाईच्या मागणीचा मागमूसही त्यांना नसतो. असे कसे ?

सध्या शिवसेनेच्या वळचणीला लागलेले रिपाई नेते रामदास आठवले यांनी शनिवारी त्यांच्या लोकसभेच्या भावी मतदार संघातून (सोलापूर) इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम १५ ऑगस्टपर्यंत सुरू केले नाही तर, राज्यभर आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला आहे.  मुंबईचे 'काळजीवाहू' सरकार उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मित्रपक्षाच्या मागणीचा मुख्यमंत्र्याच्या भेटीत जाताजाता तरी उल्लेख केला का ? की, डॉ. बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकामुळे मुंबईची शान वाढणार नाही, असे त्यांचे मत आहे. हे तरी स्पष्ट करावे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशावर अनंत उपकार आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारून जगात आपलाच सन्मान वाढले. असे उद्गार देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी इंदू मिलची जागा स्मारकासाठी देताना काढले होते. या साडेबारा एकर जागेतही जागतिक दर्जाचे थीम पार्क उभे करता येणे शक्य आहे, आणि ते होणारच आहे. त्यासाठी उद्धव यांच्या शिफारशीचीही गरजही नाही.  त्यादृष्टीने सर्व आंबेडकरवादी संघटना आणि पक्ष सरकारकडे पाठपूरावा करतीलच. पण, रेसकोर्सच्या जागेचा आग्रह शिवसेना का धरत आहे, हे कोणाला कळत नाही असे जर त्यांना वाटत असेल तर, त्यांच्या इतके खुळे तेच आहेत असे म्हणावे लागेल.
थीम पार्क आणि उद्यानाच्या आडून स्मारकासाठी जागा लाटणे हे बाळासाहेब ठाकरेंना तरी पटले असते का? स्मारकांचा उपयोग काय, तर कावळ्यांचे राहाण्याचे हक्काचे ठिकाण. स्मारकांबद्दल असे मत ज्या बाळासाहेब ठाकरेंचे होते, त्यांच्या स्मारकासाठी त्यांच्याच शिवसेनेने असा खेळ खेळावा हे मनाला पटत नाही. अद्वितीय व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेबांचे स्मारकही  भव्य दिव्य असेच झाले पाहिजे. त्यांचा स्वभाव आणि ते जसे रोखठोक आयुष्य जगले तसेच लख्ख सूर्य प्रकाशात, सर्वांना कळेल असे व्हायला पाहिजे. मात्र, बाळासाहेबांच्या शिवसेनेची धमक आजच्या शिवसेनेत राहिलेली दिसत नाही. म्हणूनच हे थीम पार्कचे सोंग घेतले जात आहे, असे वाटते. अन्यथा एखाद्या राजकीय पक्षाचा नेता भर रस्त्यावर काही पत्रकारांच्या वेटोळ्यात उभे राहून, 'हो हो. जर कोणी तशी सुचना केली तर, त्याचे अभिनंदनच आहे.' हे आपली इच्छा कोणाच्या तरी तोंडून वदवून घेत असेल तर, या पेक्षा वेगळी त्या पक्षाची नामुष्की ती काय असू शकते. त्या क्षणाला बाळासाहेबांची प्रकर्षाने आठवण होते. त्यांना जर कोणी असा प्रश्न विचारला असता तर, त्यांनी त्याची तिथेच फे फे करून टाकली असती. शिवसेना अशी अडून-लपून काही करत नाही, जे काही करायचे ते बिनधास्त, समोरा-समोर करते आणि करेल, असे त्यांनी त्या तिनपाट पत्रकाराला सुनावले असते.

  मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या तीन गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो! असे प्रबोधनकार ठाकरे नेहमी म्हणत. आता शिवसेनाही केवळ तीन नावावर जगत आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. ती तीन नावे म्हणजे, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...