मुख्य सामग्रीवर वगळा

मुंबई - मराठीचा वांझोटा वाद

मुंबई कोणाची? महाराष्ट्रात मराठी सक्तीची. हा वाद पुन्हा एकदा चांगलाच रंगलाय. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत टॅक्सी परवाना मराठी बोलता येणारांनाच दिला जाईल असं म्हटलंय. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्र्यांना कान पिचक्या दिल्या असाव्यात. परिणामी अशोकरावांनी 'यु टर्न' घेत टॅक्सी चालकांना ग्राहकांना समजेल (अर्थात हिंदी-गुजराथी) अशा स्थानिक भाषेत संवाद साधावा असा पवित्रा घेतलाय.
या टॅक्सी परवान्यावरुन उद्योगपती मुकेश आंबानी यांना एनडीटिव्हीच्या एका चर्चासत्रात बरखा दत्त यांनी छेडलं असता, त्यानीही 'मुंबई सर्व भारतीयांची आहे', असं म्हटलं . झालं, शिवसेना - मनसे या मुद्यांच्या शोधात असलेल्या पक्षांना आयता विषय मिळाला. आंबानींच्या 'मुंबई इंडियन्स' च्या कॅप्टननेही असचं वक्तव्य मुंबईत केलं तेव्हाही बाळ ठाकरे आणि कंपनीला हे मुंबई वेगळे करण्याचे कारस्थान वाटले. आता आंबानी आणि सचिन कोणत्या सत्तास्थानावर आहेत की, ज्यांच्या बोलण्याने मुंबई वेगळी होईल हे ठाकरेंनाच माहित. मात्र या वक्तव्यामुळे असं बोलणा-यांना सेना धडा शिकवेल असं शिवसेनेचे मुखपत्र सामनातून सांगितलं गेलंय . तेही अत्यंत सभ्य भाषेत. कारण ते एका उद्योगपतीच्या विरोधातील वक्तव्य होतं. तर दुसरीकडे 'नाईट रायडर'चा मालक आणि अभिनेता शाहरुख खान याने पाकिस्तानी खेळाडूंना संघात घेता आले नाही याची खंत व्यक्त केली. झालं. पुन्हा एकदा सेनेचा आगाऊ राष्ट्रवाद उफाळून वर आला. भारतात पाकिस्तानी खेळाडूंना खेळू देणार नाही. शाहरुख मधील खान जागा झाला असेल तर त्याने 'मन्नत' सोडून कराचीला जाऊन खेळावे. असं शिवसेनेचे पगारी कार्यकर्ते खासदार संजय राऊत यांनी टीव्ही चॅनल्सच्या कॅमेरासमोर म्हटलं, आणि दुस-याच क्षणी
ठाण्यात आमदार एकनाथ शिंदेंनी 'माय नेम इज खान' चे पोस्टर जाळायला सुरुवात केली. सिनेमागृहाबाहेर पत्रकही लावले की शाहरुख खान जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत 'माय नेम इज खान' चे खेळ होउ देणार नाही. असे शिवसेनेचे एकाच वेळी मुंबई आणि मराठीचे वाक् बाण मुख्यमंत्र्यांपासून युपी-बिहारी पर्यंत सुटले. दुसरीकडे मुकेश आंबानी , शाहरुखवरही तोंडसुख घेण्याची संधी सेनेने सोडली नाही.
या मुंबई - मराठीच्या वादात आता 'रास्वसंघाचे' सरसंघचालक मोहन भागवतांप्रमाणेच कॉग्रंसचे युवराज राहूल गांधीही उतरले. युपी बिहारींना हकला म्हणणारांनी 'मुंबईवर हल्ला झाला तेव्हा एनएसजी कमांडोंना तुम्ही युपी- बिहारचे आहात म्हणून मुंबई बाहेर जायला सांगितले नाही, तर त्यांची मदत स्विकारली. असेच आपल्याला विकास साधायचा असेल तर सगळ्यांना सोबत घेवून पुढे जावे लागेल.' असं राहूल गांधीनी म्हटलंय. त्यावर सेनेने राहूलला रोम पुत्र म्हणत अत्यंत खालच्या थरावर जावून टिका केलीय. त्यांनंतर 5 तारखेला खासदार राहूल गांधी मुंबईत आले. लोकलने प्रवास केला. आपले कार्यक्रम यशस्वी पारपाडले आणि निघून गेले. मात्र शिवसेनेने 5 - 25 काळे झेंडे दाखविण्यापलिकडे काहीच केले नाही.
एकंदर मराठीच्या मुद्यावर बॅकफूटवर गेलेली शिवसेना, मनसेला मागे टाकून आता पुन्हा एकदा नव्या जोशात पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेची ही तयारी आहेच.
मुळातच मराठीचा आग्रह . युपी - बिहारींवरील हल्ले. ऑस्ट्रेलिया - पाकिस्तानी खेळाडूंना मुंबईत भारतात खेळू न देण्याचा पवित्रा . पाकिस्तानी कलाकारांचे भारतात होणारे कार्यक्रम उधळणे किंवा उधळण्याच्या धमक्या देणे, हे मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या विकासाचे मुद्दे नाहीत. मराठी माणसालाही यात काही स्वारस्यं उरलेलं नाही.
सामान्य माणूस हा त्याच्या स्वंयपाक घरातील चिजवस्तूंचे भाव वाढल्याने ग्रासला आहे. पाणी वेळेवर येत नाही. पुरेसी विज मिळत नाही याने त्रासला आहे. पब्लिक ट्रांसपोर्ट चे धक्के खावून वैतागला आहे. तो या सर्व वक्तव्यांकडे - भाषणबाजीकडे तिरकसनजरेने करमणूक म्हणून पहात आहे. कारण यातून आउट-पुट काहिच नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...