मुख्य सामग्रीवर वगळा

मी गर्दीशी बोलतोय....


रोजचा दिवस नवा, हे प्रत्येकालाच माहित आहे. त्यात मला सांगण्यासारखे वेगळे असे काही नाही. आजचा दिवसही कालच्या सारखाच गेला. रोजच्या नियमाप्रमाणे ऑफिसमध्ये आलो, ऑफिसामध्ये मला नेमून दिलेले काम पूर्ण केले आणि आता घरी जायची वेळ टळून गेली आहे. बरेच दिवस झाले ब्लॉगवर काही अपडेट दिल्या नाही म्हणून हा प्रपंच.
आता मी मुंबई सोडून आठ-नऊ महिने झाले आहेत. आता मी माझ्या मुळ गावी म्हणजे औरंगाबादमध्ये आहे. एवढ्या दिवसांनी मी लिहित आहे, म्हणजे मुंबईत मुबलक वेळ होता असा त्याचा मुळीच अर्थ नाही.
मुंबईतील पूर्णवेळ हा ऑफिससाठी होता. कारण तिथे मी ऑफिस संपल्यानंतर घरी जाऊन काय करु ? असा प्रश्न माझ्या समोर उभा राहात असे. (कधी कधी नरिमन पॉईंट - मंत्रालयाकडे चक्कर मारायला जायचो. तेवढाच काय तो विरंगूळा) त्यामुळे वाचन ब-यापैकी वाढलं होतं. हा ही त्या वेळेचा मला फायदा झाला. इथे म्हणजे औरंगाबादला मात्र ऑफिस व्यतीरिक्त अनेक कामे असतात, त्यामुळे कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर घरची आणि इतर काही महत्त्वाची कामे उरकण्यात दिवस निघून जातो आणि दुसरा दिवस उजाड़तो.
पण, मी ही सर्वांचीच (कदाचित नसेलही. असे सन्माननीय अपवाद वगळून) बोरींग कहानी का रिपिट करीत आहे. तर असो...
एवढा वेळ झेलले त्या सर्वांना धन्यवाद. पुढेही आपले सहकार्य लाभेल असे गृहित धरतो. हे 'गृहित' राज ठाकरे सांगतात त्या प्रमाणेच बरका. उगाच ताकाला जाऊन भांडे लपवायला नको. (ही सगळी मंडळी तुम्हाला गृहित धरतात. आपलीच माणसं आहेत. जाणार कुठे. कसंही वागवलं, कितीही त्रास झाला तरी मते आपल्यालाच देणार. असं गृहित धरतात. इति राज ठाकरे)
आता या राज ठाकरेंनी मुंबईचा 'किंग मेकर' मी असणार अशा खूप बाता मारल्या मात्र मुंबैकरांनी 'काका'ला अर्थात बाळासाहेब ठाकरेंना पुन्हा एकदा ही २१ हजार कोटी की काय ते, कोंबडी बहाल केली आहे. (आपल्याला त्यातले फारसे आकडे तोंडपाठ नाहीत बुवा.) आणि त्यांनीही ती काखोटीला मारून मिळवून दाखविलाचा 'गजर' सुरु केला आहे. या ठाकरे कुंटूंबाच्या कौटूंबिक भांडणात पवारांच्या घड्याळाचा गजर फक्त पिंपरी-चिंचवडमध्येच झाला. बाकी मुंबैकरांनी काँग्रेसला नेहमीप्रमाणे 'हात' दिला. दिल्लीवरुन आऊटसोर्स केलेले पृथ्वीराज चव्हाण यांना अजून काही हा मुंबै आणि महाराष्ट्राचा खेळ कळालेला दिसत नाही. तसे पृथ्वीबाबा तंत्रज्ञानात अतिशय हुषार पण या महाराष्ट्राचे तंत्रच वेगळे आहे त्याला ते तरी काय करतील बिचारे . हे एकटेच काय ते विकासाच्या चार गोष्टी मतदाराच्या गळी उतरवत होते. बाकी अजित पवार त्यांना दादा म्हणण्याची प्रथा आहे ती टाळून, त्यांनी मुंडेंमागे घरचेच लचांड लावून दिले. मुंडे बिचारे दिल्ली , मुंबै , उर्वरीत महाराष्ट्र सोडून बीड आणि त्यातही परळीत मुक्काम ठोकून बसले. त्यांना या धाकल्या पवारांनी मानसिक संतूलन बिघडल्याचेही प्रमाणपत्र देऊन टाकले. आता मराठवाड्यातील माणसाला बोलल्यावर माझ्यासारख्या दुस-या मराठवाड्यातील माणसाला पक्ष-बीक्ष बाजूला ठेवून वाईट वाटतचं. पण वाटून करणार काय 'सौदा'च सारा. रामदास आठवलेनी नाही केला, शिवसेनेबरोबर दलित मतांचा सौदा.
या सौद्याच्या भाजीची शिवसेनेला काही चव आली नाही मात्र रामदास आठवले आपली चव घालवून बसले. काय ती शेरो शायरी, काय त्या कविता. नुसतं ट ला ट , प ला प. काहीही असो, त्यांच्यातील कवीला खासदारकी गेल्यानंतर नॅशनल स्टेज मिळाला नव्हता, तो उद्धव ठाकरेंनी एमएमआरडीएचा मिळवून दिला, आणि हक्काचा प्रेक्षकही. आता या पुढे शिवसेना त्यांना कशी ट्रिटमेंट देते हे पाहावे लागेल.
तर मी काय सांगत होतो. हं , राज ठाकरे. राज ठाकरे हे मुंबईत नाही पण जवळच्याच नाशिकमध्ये किंग मेकरची भूमिका निभावणार आहे. नाशिकमध्ये राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन सगळ्यांनाच धक्के देत चांगलेच धावले आहे. आता ते इथे भाजप आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करतीलही आणि त्यांच्या मनात असलेली ब्लू प्रिंट आपल्याला पहायला मिळेल अशी अपेक्षा महाराष्ट्राने गृहित धरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...

मोदी-शहा जोडींने का निवडले रामनाथ कोविंद यांना

मोदी-शहा जोडीचा खेळ खरच अगम्य आहे. कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले नाव त्यांनी राष्ट्रपती पदासाठी पुढे केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि शिवसेनेने पुढे केलेले मोहन भागवत, डॉ. एम.एस स्वामिनाथन या सर्वांना बाजूला करत शहांनी पत्रकार परिषदेत रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशचे दलित व्यक्ती, एकेकाळी आएएएस परीक्षा उत्तीर्ण परंतू वकिलीचाच पेशा कायम ठेवणारे भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दोनवेळा राज्यसभा सदस्य आणि सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या कोविंद यांचे नाव पुढे करुन मोदी-शहा जोडीने सर्वांचीच (विरोधकांची) पंचायत करुन टाकली आहे. मोदी आणि शहा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात 2020, 2022 मध्ये हे साध्य होईल किंवा हे ध्येय गाठले जाईल असे सांगतात तेव्हा विरोधक त्यांची खिल्ली उडवतात. अजून 2019 बाकी आहे. मात्र या जोडीने 2019 ची तयारी ही किती आधीपासून केली याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक निर्णयातून विरोधकांना यायला हवी. 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील संपूर्ण दलितांची मते ही भाजपच्या पारड्यात पडण्यास...