मुख्य सामग्रीवर वगळा

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ 

नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही.
केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडासात ते पुस्तके ठेवून त्याबद्दल असलेली तुच्छतेची भावना कमी करण्याचा कसा प्रयत्न करत होते. गांधींनी कोणा-कोणाच्या हातात झाडू देऊन प्रथम तुम्ही स्वतःच्या मनाची आणि नंतर देशातून  इंग्रजांची स्वच्छता करण्यास सज्ज व्हा असे सांगितले याचीच चर्चा होत आहे. हे चांगले ही आहे.
आपल्याकडे वैयक्तिक स्वच्छतेची फार काळजी घेतली जाते. मात्र सार्वजनिक स्वच्छतेकडे कोणीच लक्ष देत नाही. हा बदल स्वागतार्ह्य आहे. प्रत्येकाने स्वतःच्या घरासोबत घरा शेजारील परिसर स्वच्छ ठेवण्यास सुरुवात केली तर शहर आणि देश स्वच्छ  राहाण्याला मदतच होईल.

>> गोहत्येच्या संशयावरुन एकाची सफाई 
भाजप सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी-गांधी करत असताना त्यांच्या पक्षाचे आमदार-खासदार  आणि कार्यकर्ते गांधींच्या अहिंसेची दिवसाढवळ्या  हत्या करत आहेत.  गांधी जयंती होण्याच्या काही दिवस आधी बकरी ईद होती. मुस्लिमांचा हा सण साजरा झाल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील दादरी या गावात अखलाक या मुस्लिम गृहस्थाची  गोमांस खात असल्याच्या संशयावरुन ठेचून हत्या करण्यात आली तर त्याच्या २० वर्षांच्या मुलालाही मारण्याचाच जमावाचा विचार होता मात्र त्याला अर्धमेला करुन सोडून देण्यात आले. आता तो मृत्यूशी झुंजत आहे.
मोदी देशातून कचरा-घाण नष्ट करण्यासाठी स्वच्छता अभियान राबवत असताना त्यांचे भक्त आपल्या विचारांनूसार वागणार नाही त्यांची देशातून सफाई करण्याच्या मागे लागले आहेत. या देशात कोणी काय खावे यावर कित्येक शतकांपासून बंधने आहेत. ती सार्वजनिक ठिकाणी बेमालूम पद्धतीने पाळली ही जात होती. मग भाजप सरकार आल्यापासूनच लोकांच्या मुदपाक खाण्यात डोकावण्याची ही  वळवळ का सुरु झाली ? आपापल्या घरात कोणी काय खावे याला कोणी कसे बंधन घालू शकतो ? बरं ज्या अखलाकला ठेचून ठार मारले त्याच्या घरात सापडलेल्या मांसाच्या तुकड्यांची तपासणी करण्यात आली आणि हा लेख लिहित असतानाच त्याचा रिपोर्ट आला आहे. त्यानूसार ते 'बीफ' नव्हते तर 'मीट' होते असा अहवला केंद्राला देण्यात आल्याची माहिती आहे. मीट हा देखील संदिग्ध शब्द आहे. मग ते मीट बकऱ्याचे होते, की बैलाचे होते की गायीचे होते की इतर कशाचे हा प्रश्न उरतोच... त्या खोलात शिरण्याची ही जागा नाही. मुद्दा एवढाच आहे की प्रत्येकाने आपापल्या घरात काय खावे हे देखील आता सरकार आणि समाज ठरवणार आहे का ? आणि जर मला काही विशेष खायचे असेल तर मग देश सोडूनच जावे लागेल का ? हाच न्याय भारतातून सिलिकॉन व्हॅलीत गेलेल्यांना लावला तर ? त्यांनी जर फक्त स्वदेशींनाच नोकरी आणि व्यवसाय देण्याची सक्ती केली तर,  तेथील आपल्या भारतीय बांधवांची स्वच्छता झाल्याशिवाय राहाणार नाही.पण आपला स्वतःसाठी एक आणि इतरांसाठी दुसरा न्याय असतो.
देशात ही इतर धर्मिंयांची सुरु असलेली स्वच्छता मोहिम काळजी करायला लावणारी आहे. सीरियामध्ये ज्या प्रमाणे अत्याचार होत आहेत त्यानंतर तेथून पलायन सुरु झाले आहे. तशी परिस्थिती भारतात आणयची आहे का?  असा प्रश्न पडतो.

>> सनातन स्वच्छता 
महाराष्ट्रात एकानंतर एक दोन पुरोगामी विचार मांडणाऱ्यांची एकाच पद्धतीने 'स्वच्छता' करण्यात आली आहे. यातील पहिले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली तेव्हा राज्यात आघाडीचे सरकार होते. दुसरी हत्या कॉम्रेड अॅड. गोविंद पानसरे यांची शाहू नगरी कोल्हापूरात भाजप-सेना आणि त्यांच्या मागे लागून आलेल्या आठवले-जानकर यांच्या महायुतीच्या काळात झाली.  कॉम्रेड पानसरेंच्या हत्येत समीर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. तो सनातन संस्थेचा साधक असल्याची माहिती आहे. त्यांनतर सनातन बद्दल सर्वच माध्यमांमधून जी माहिती समोर येत आहे, त्यावरुन ही संस्था आहे की एखादी गुढ गुहा (आलीबाबाची गुहा असे म्हणण्याचा मोह खूप टाळला) असा प्रश्न सर्वच विचारी माणसांना पडला असेल. या संस्थेवर बंदीची मागणी दाभोलकरांच्या हत्येपासून होत आहे, आता समीरला अटक झाल्यानंतर ती वाढली आहे. मात्र सरकार या संस्थेची स्वच्छता करण्यास उत्सूक नसल्याचे सत्तेतील अनेक मंत्र्यांची वक्तव्ये पाहिल्यानतंर लक्षात येते. याचा अर्थ सरकारलाही या संस्थेने किती 'संमोहित' करुन ठेवले असेल हे सुज्ञांना न सांगावे लागे. 

फोटो - १- मुंबईतील स्वच्छ भारत अभियान.
           २ - दादरी येथील मृत अखलाकची मुलगी आणि नातेवाईक
           ३ - कॉम्रेड पानसरेंच्या हत्येत अटक केलेला समीर गायकवाड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...