मुख्य सामग्रीवर वगळा

उजेडाची फुलं कोण जपणार ?


तुम्ही एक दिवस घरी उशिरा जाणार असाल तर बायकोचे नाहीतर आईचे पाच-दहा फोन येऊन गेलेले असतात. केव्हा येशील.  कुठे आहेस. किती वेळ लागले. कोणासोबत आहे. यापेक्षा  काही वेगळे प्रश्न तुमच्या कुटुंबियांच्या मनात येत नसतील. पण तो आता तुरुंगाचाच होऊन गेला आहे. त्याच्या दीड वर्षाच्या मुलाने सात महिन्यापूर्वी आपल्या बापाला पाहिले होते जाळीपलिकडे. त्या पोराला आपल्या बापाच्या खांद्यावर बसून गावभर फिरावं वाटलं नसेल का?  त्याच्या आई-बापाच्या दुखण्यात त्यांना वाटलं  नसेल का, की लेक असता तर दहा ठिकाणी घेऊन गेला असता आपल्याला. त्या क्रांतिकारी भगिनीच्या अंर्तमनाची घालमेल वेगळी  सांगायची काय गरज आहे. तिच्या मनात क्रांतीची आग आहे आणि ओठावर नक्षलवादी असल्याच्या संशयाने तुरुंगात टाकलेला नवरा - जीवनसाथी सचिन माळीचे गीत आहे.

शीतल साठे आणि सचिन माळी यांना नक्षलवादी असल्याच्या संशयाने महाराष्ट्राची एटीएस शोधत होते. यांचा गुन्हा काय तर बुद्ध-फुले-शाहू-बाबासाहेबांची गीतं लिहातात आणि म्हणतात.  दोघांनीही 2013 मध्ये मंत्रालयासमोर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. कारण काय तर आम्ही नक्षलवादी नाही हे सिद्ध करायचे होते. क्रांतीची गाणी गातो. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना त्यांचे शोषण होत असल्याचे उर बडवून सांगतो. आपला खरा आणि एकमेव बाप - बाबासाहेब. त्याचे कसे वाटे पाडले जात आहे. कोण कसा त्याचा लिलाव मांडत आहे. बिर्ला-बाटासोबत आता अंबानी-अदानी कसा तुमचा आटा पळवत आहे, हे सांगतो. हे सांगण जर लोकशाहीत गुन्हा आहे तर आम्ही जेलमध्ये जातो, यासाठी दोघांनी पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे ठरवले. ते आत्मसमर्पण नव्हते. शीतल आता जामीनावर बाहेर आली आहे. दीडवर्षांच्या त्यांचा मुलगा अभंग आता तिच्यासोबत असतो.

क्रांतीची गाणी लिहिण्याची आणि म्हणण्याची किती मोठी किंमत मोजत आहेत हे दोघं. आणि त्यात पोराचा - अभंगचा काय दोष. ज्याला अजून क्रांतीही निट म्हणता येत नसेल. काल औरंगाबादमध्ये विद्रोही शाहीरी जलसा झाला. तुडूंब भरलं होतं सभागृह. शीतल साठेंनी दगडालाही पाझर फुटावा अशा आर्तस्वरात बाबासाहेब,  शिवबा-सावित्री-फुले-शाहू सांगितले. खरा शिवाजी सांगणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरेंची वडिलकीची थाप आता पाठीवर पडणार नाही याचं आभाळभर दुःख असल्याचेही सांगितले. पण या 'उजेडाच्या फुलां'ना हा समाज जपणार की नाही? हा सवालही सर्वांसमोर ठेवून गेली. सचिन अजून किती दिवस तुरुंगाच्या भिंतीवरच लिहित राहाणार. तुरुंगात असूनही त्याचा आवाज बाहेर घुमतो आहे, पण बाहेरचा आवाज त्याच्यासाठी कधी उठणार ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...