शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेलही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार, ज्या खोलीत बसून आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली ती खोली एका रात्रीतून हाय-फाय करण्यात आली आणि योगी जाताच अर्ध्या तासात सुख-सुविधेच्या सर्व वस्तू काढून घेण्यात आल्या. शहीदाच्या घराला पुन्हा तिच कळा आली.
इश्वर चंद्र यांना त्या वस्तू आपल्याच घरात राहाव्या अशी इच्छाही नाही. पहाडासारखा मुलगा गेल्यानंतर या सुख-सुविधांचं करायचे काय? हा त्या बापाचा सवाल होता. ते खरं ही आहे. मात्र मुख्यमंत्री येणार म्हणून एका रात्रीतून शहीदाचे घर हाय-फाय करणे आणि त्यांची पाठ वळताच घरात लावलेला एसी, गालिचा, टॉवेल, सोफा काढून घेणे ही कोणती देशभक्ती आहे.
दानवेंच्या घरी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'
भाजपशासित एका राज्यात अशी पोकळ राष्ट्रभक्ती तर आपल्या महाराष्ट्रात भाजपचे वाचाळ प्रदेशाध्यक्ष हे शेतकऱ्यांप्रती शिवराळ भाषेचा वापर करतात. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या बंगल्याबाहेर बसलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची शुक्रवारी सकाळी त्यांच्या बगलबच्च्यांनी टिंगलटवाळी सुरु केली होती. मात्र मीडियामध्ये उपोषणाची बातमी झळकली आणि गर्दीवाढू लागली तेव्हा हा प्रकार बंद झाला. 'मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. 30-35 वर्षांपासून राजकारणात आहे', असे निवेदन प्रसिद्ध करुन सांगणाऱ्या दानवेंनी उघड्यावर बसलेल्या या शेतकऱ्यांच्या पोरांची किव आली नाही. त्यांना भेटणे तर दूरच आपला एखादा प्रतिनिधी पाठवून त्यांचे काय म्हणणे आहे हेही जाणून घ्यावे, असेही दानवेंना वाटले नाही. उलट, सत्ताची धुंदी डोक्यात गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी बळाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या सहा पोरांना रात्रीच 'उचलण्याचे' आदेश दिले. भोकरदनमध्ये उपोषण सुरु असताना पोरांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि जालन्याच्या पोलिस स्टेशनला नेऊन ठेवले.
भाजपच्याच राज्यातच असे का होते, याचा भाजप नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे. भाजपची मातृसंस्था नेहमी 'दक्ष' राहात असते, मात्र अशावेळी नेत्यांचे कान उपटण्याचे कधी पाहाण्यात आलेले नाही. शेठजी-भटजींच्या या पक्षाला गोपीनाथ मुंडे सारख्यांनी बहुजन चेहरा दिला. शेतकरीवर्गही आता भाजपच्या झोळीत भरभरुन मतांचे दान टाकत आहे. तेव्हा या शेतकऱ्याचीतरी काळजी सरकारने घेतली पाहिजे. मुख्यमंत्री आज जालन्यात आहेत. त्यांनीतरी संवेदनशीलता दाखवून त्या पोरांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडायला लावले पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा